नुकताच भारतीय क्रिकेट संघानं टी-२० विश्वचषक सामन्यात विश्वचषक जिंकून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेला सामना जितका रोमांचक होता तितकेच त्यानंतर क्रिकेटर्स भावूक होताना पाहणंदेखील चाहत्यांसाठी रोमांचकारी होते. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याबरोबरच हार्दिक पांड्याचीदेखील मोठी चर्चा होत होती. आता टी-२० विश्वचषकानंतर त्याच्या खासगी आयुष्याबाबत पुन्हा चर्चा होताना दिसत आहे.

काही दिवसांपासून हार्दिक पंड्याच्या खासगी आयुष्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत होतं. तो आणि त्याची पत्नी नताशा हे विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात होते. मात्र, हार्दिक आणि नताशा यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्या नताशानं विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक किंवा भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारी एकही पोस्ट का शेअर केली नाही, असा नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. नताशानं भारतीय संघाच्या विजयानंतर कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या वेगळं होण्याबाबत, घटस्फोटाबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

एका रेडिट युजरनं नताशाच्या सोशल मीडियाचा स्क्रीनशॉट शेअर करीत म्हटलं आहे, “हार्दिक पंड्या पत्नी नताशापासून वेगळा झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. कारण- भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर नताशानं हार्दिक किंवा संपूर्ण संघाला विजयाबद्दल शुभेच्छा देणारी एकही पोस्ट शेअर केली नाही. या विजयात तिच्या पतीचं अर्थात हार्दिकचं मोठं योगदान आहे. इतर वेळी नताशा सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सतत सक्रिय नसूनदेखील अनुष्का शर्मानं विश्वचषकानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती; परंतु नताशा असे काहीही करताना दिसली नाही.”
मात्र, अनेकांनी या मताचा विरोध केला आहे. एकानं म्हटलं आहे- “ती आपल्या पती आणि मुलासोबत आनंद साजरा करू शकत नाही का? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणं गरजेचं नाही.”

हेही वाचा: “डॅडा, बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?” ६ वर्षांच्या लेकीने प्रश्न विचारताच आदिनाथ कोठारेला उत्तर सुचेना, म्हणाला…

दरम्यान, नताशा आणि हार्दिक यांनी २०२० मध्ये लग्न केलं. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव अगस्त्य असून, हार्दिक आणि नताशा त्याच्याबरोबर मजा करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडीयवर शेअर करीत असतात. नताशा स्टॅनकोविक ही एक सर्बियन अभिनेत्री व मॉडेल आहे. तिनं बॉलीवूडमध्ये प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या भावूक होताना दिसला होता. “गेल्या सहा महिन्यांत माझ्या आयुष्यात जे जे घडलं, ते ते पाहता हा विजय माझ्यासाठी विलक्षण असा आहे. मी कशाबद्दलही एक अक्षरही बोललो नाही; पण मला माहीत होतं की, माझा दिवस येईलच”, असं म्हणत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं.