गेले काही दिवस दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या ‘गॉडफादर’ची चांगलीच चर्चा आहे. चित्रपाटाने फारशी कमाई केली नसली तरी चिरंजीवी यांना पाहण्यासाठी लोकांनी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली. शिवाय यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसुद्धा एका वेगळ्या भूमिकेत होता त्यामुळे सलमानचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. चिरंजीवी हे बऱ्याच वर्षांनी त्यांच्या डॅशिंग भूमिकेत पुन्हा दिसणार असल्याने त्यांचे चाहते या चित्रपटाला चांगलाच पाठिंबा देत आहेत.
याच वर्षी चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा ‘राम चरण’ हे दोघे एकत्र एका चित्रपटात झळकले तो म्हणजे ‘आचार्य’. या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. आता याच चित्रपटाशी संबंधित राम चरण आणि चिरंजीवी यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. चिरंजीवी यांनी या चित्रपटाच्या अपयशाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमात या चित्रपटाच्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “मला विद्या बालनबरोबर…” जेव्हा शर्लिन चोप्राने व्यक्त केलेली विचित्र इच्छा
चिरंजीवी म्हणाले, “एखादा चित्रपट जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा त्याची जबाबदारी मी घेतो, आचार्यच्या अपयशाचीसुद्धा जबाबदारी मीच घेतली आहे. तो चित्रपट केल्याचा माझ्या मनात कसलाही पश्चात्ताप नाही. एवढंच नाही मी आणि राम चरण आम्ही दोघांनी आमच्या मानधनाचा ८०% वाटा निर्मात्याला परत केला आहे.” पहिल्या कधी दिवसांत ७३ कोटी इतकी कमाई करणारा आचार्य नंतर मात्र सपशेल आपटला. पहिल्याच सोमवारी चित्रपट काढायचा निर्णय दक्षिणेतील बऱ्याच चित्रपटगृहाच्या मालकांनी घेतला होता.
कोरताला सिवा दिग्दर्शित ‘आचार्य’ हा एका सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा चित्रपट होता. या चित्रपटाची विचारधारा प्रेक्षकांना पसंत न पडल्याने दक्षिणेत लोकांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला होता. चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर गॉडफादरने १०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाकडून जास्त अपेक्षा असली तरी त्याने चांगली कमाई केली आहे. सलमान खान, नयनतारा, सत्यदेव हे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील.