‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुधंती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मधुराणी या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक महिलांसाठी तर ती आयडॉल झाली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या मधुराणीला मात्र एका गोष्टीचा भयंकर तिटकारा आहे. तिला या गोष्टीमुळे तणाव येतो. मधुराणीला तिटकारा असणारी ही गोष्ट नेमकी कोणती? जाणून घ्या…

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी ‘बिंगेपॉडस मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं की, कविता तुझ्या मनाचा हळवा कोपरा आहे. तशीच काही माणसं देखील तुझ्या मनाचा हळवा कोपरा असतील. तर तुझ्या मुली व्यतिरिक्त कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मधुराणी म्हणाली, “माझी आई. ती शास्त्रीय संगीत गायिका आहे. तिने वयाच्या ६५व्या वर्षी पीएचडी केली. आपण आपल्या आईकडून स्त्रीपण शिकतं असतो. बाईपण शिकतं असतो. मी तिला बघत मोठी झालीये. म्हणजे तिची कलेप्रतीची तळमळ मी पाहिली आहे. तिचा ध्यास पाहिला आहे आणि ते पाहत असताना मी हे देखील पाहिलं की, मला काय करायचं नाही. जे माझ्या आईने केलंय. तिने स्वतःला संसारात गाडून घेतलं.”

पुढे मधुराणी म्हणाली, “माझे वडील दुपारी तीन, साडे तीनला घरी परत यायचे. आमचा विड्याच्या पानांचा हॉलसेल गाला होता. तिथे ते मंडईत जायचे आणि आम्ही तुळशी बागेत राहायचो. ते पाच मिनिटांत घरी पोहोचायचे. त्या पद्धतीने जेवणं व्हायचं. ती फोन करायची, काय जेवण करायचं वगैरे. मग बाबा तिकडून फर्माइश करायचे. मग ते येण्याआधी ती बनवायला घेणार, त्यांना ते गरम गरम वाढणार आणि मग रोज तिला ते कुतुहल, उत्सुकता असायची, नवऱ्याला आवडलंय का? आईचा बराच वेळ स्वंयपाक घरात जायचा. घरातली काम करण्यातच जायचा.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर जर अभिनेत्री नसती तर कोण असती? जाणून घ्या…

“मी तिला एकेदिवशी म्हटलं, तू काय पातळीची गायिका आहे हे तुला कळतं का? तू यातल्या गोष्टी नाही केल्यात तर चालणार आहे, संसार चालतो. पण त्याकाळातली परिस्थितीची अशी होती, लोकं काय म्हणतील. मुलीकडे दुर्लक्ष करून मी गायतेय. मला मुली वाढवायच्या आहेत. नवऱ्याला मला गरमच वाढायचं आहे. मी म्हटलं, तू स्वयंपाक १२ वाजायच्या आत करना. म्हणजे ते येईपर्यंत तुला रियाज करता येईल. मला हे सगळं आठवी-नववी पासूनचं कळतं होतं. त्यामुळे गंमत अशी झाली की, मला स्वयंपाक या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला. लोकांना स्वयंपाक करणं तणावमुक्तीचं माध्यम वाटत असेल, पण मला ओट्यापाशी उभं राहिलं तरी तणाव येतो. मला असं वाटतं हे कोणीतरी करू शकत. हे मी नाही करायला पाहिजे. नाहीतर मी याच्यात अडकून राहील. याविषयी माझ्या मनात भीती निर्माण झालीये. हे जर मी करायला लागले आणि रमले ना तर हे घातक आहे. मी हेच करत राहीन,” असं मधुराणी म्हणाली.

Story img Loader