गेल्या कित्येक वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिकेद्वारे अनिरुद्धच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात. अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ते कायम चर्चेचा विषय असतात. दैनंदिन जीवनातील गोष्टींशिवाय बऱ्याच विषयांवर ते परखड लिहित असतात. आज मिलिंद गवळी यांनी आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तसेच आईचे काही व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत.

अभिनेते मिलिंद गवळी यांच्या आईला जाऊन आज पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. २ मार्च २००९ साली त्यांच्या आईचं निधन झालं. याचनिमित्ताने मिलिंद गवळी यांनी आईच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – रिहानाच्या काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबांनींनी मोजले ‘इतके’ कोटी, वाचा मानधनाचा आकडा

मिलिंद गवळी यांची पोस्ट

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि ती म्हण अगदी खरी आहे. अजून एक अशीच म्हण आहे ‘मातृदेवो भव:’ ती पण म्हण खरी आहे. आज बरोबर पंधरा वर्षे झाली माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ . या पंधरा वर्षात अनेक वेळेला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वणी सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकवीरा देवीच्या मंदिरात गेलो की त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतं. आज शरीराने ती आमच्यात नाहीये पण तिने हे देवीचे रूप धारण केलंय असंच मला वाटतं. जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते.

आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून पण जगतोय. अनेक भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. अनेक नाती अनुभवता आली, जगता आली आहेत. त्या सगळ्या नात्यांमध्ये ‘आईमुला’चं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला तोडच नाही. जगामध्ये त्याच्यापेक्षा, पवित्र त्याच्यापेक्षा, निर्मळ, त्याच्यापेक्षा घट्ट नातं असूच शकतं नाही असं माझं मत आहे. म्हणून मला सारखं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्याजवळ त्यांची आई आहे ते फार नशीबवान माणसं आहेत. माझी आई तर प्रेमाचा, वात्सल्याचा न संपणारा झराच होती. तिने कधीही लहानमोठा, गरीबश्रीमंत असा भेदभाव केला नाही. अन्नपूर्णा आणि सुगरण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची. आलेल्या कोणत्याही पाहुण्याला अतिथी देवो भव समजून, त्यांच्या नोकरांना, ड्रायव्हरला सुद्धा तेवढ्याच आदराने आणि आग्रहाने पोटभर खाऊ घालायची. आणि एकदा का तिन्हे वाढलेल्या आग्रहाचे जेवण जेवून कोणी गेला असेल तर तिच्या हातच्या जेवणाची चव तो जन्मभर विसरायचा नाही.

आजच्या दिवशी तिचे विचार , तिचं म्हणणं , तिचं जगणं, व्यक्त करावसं वाटलं. तिचं कायम आहे च म्हणणं होतं, फक्त निस्वार्थ प्रेम करा, काहीच अपेक्षा करू नका, आपण काय घेऊन आलोय? आणि आपण काय घेऊन जाणार? फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद!

हेही वाचा – “प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत म्हणाले, “स्त्रियांना…”

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेही झळकले आहेत. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

Story img Loader