‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. मिलिंद गवळी यांनी नुकतंच कृषीमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांबद्दल भाष्य केले आहे.
मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी डौल मोराचा मानाचा या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष
मिलिंद गवळी यांची पोस्ट
“शेतकरी आणि कलाकार
या दोघांमध्ये काय साम्य आहे ?
दोघांमध्ये साम्य आहे का नाही आहे?
मला असं वाटतं या दोघांमध्ये खूप साम्य आहे.
दोघेही आयुष्यात खूप मोठी रिस्क घेतात,
दोघांच्याही आयुष्यामध्ये यश अपयश हे त्यांच्या हातात नसतं,
शेतकऱ्यासाठी वेळेवर पेरणी झाली वेळेवर पाऊस झाला तरच त्याला यश मिळू शकतो, कलाकारासाठी पण योग्य ती भूमिका मिळाली, या पद्धतीने साकारता आली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, शिक्षकांना ती आवडली, तरच त्याला यश मिळतं.
अतोनात कष्ट करणे या दोघांच्या नशिबात आहे,
पण कष्ट केल्यामुळे त् या दोघांनाही त्याचं यश मिळेलच याची शाश्वती नाही.
दोघांकडेही खूप आदरणीय आणि कौतुकाने पाहिलं जातं,
लोकांना किंवा प्रेक्षकांना त्यांच्या कष्टाची जाणीव असते,
पण दोघेही एकदा मार्केटमध्ये आले की त्याची किंमत लावली जाते, कधी कधी तर त्या सगळ्या कष्टाची किंमत शून्य होऊन जाते, कित्येकदा शेतकऱ्याचा माल रस्त्यावर शेतकरी फेकून देतो, कारण मार्केटमध्ये त्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही. तसंच लाखो करोडो चा सिनेमा कोणीही विकत घ्यायला तयार नसतो थेटरमध्ये तो लागत नाही आणि त्या सिनेमाची किंमत शून्य होऊन जाते.
किंवा एक मराठी सिनेमा चा producer आणि शेतकरी हजार हून अधिक सिनेमे जे बनवून तयार आहेत सेन्सर झालेले आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्याची किंमत शून्य झालेली आहे, एक मराठीचा प्रोड्युसर आणि एक शेतकरी याच्यामध्ये फारसा फरक मला जाणवत नाही.
लोकांनी त्याला आधार द्यायचा म्हटलं तरी सुद्धा ते शक्य होत नाही, शासनाच्या असंख्य schemes, subsidies
फक्त कागदावरच छान छान दिसतात, आकर्षक दिसतात, याचा प्रत्यक्ष न शेतकऱ्याला मराठी प्रोड्युसराला फायदा होतो,
उगाच का इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, उगाच का एक प्रोड्युसर मराठी चित्रपट बनवतो आणि नंतर तो कालबाह्य किंवा गायब होतो तो कधी कोणाला दिसतच नाही त्याचं, त्याच्याबद्दल कोणालाही कधीही काही माहिती नसते,
याचं माझ्या मते मुख्य कारण काय असेल तर ज्या माणसाला कृषी विभाग दिला जातो, कृषिमंत्री केलं जातं, कृषी विभागाचे सेक्रेटरी वगैरे असतात, त्यांचा शेतीशी काही संबंध नसतो, ती कधीही शेतात राबलेले नसतात शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्याच त्यांना कळत नाही माहित नसतात, आणि तसंच सांस्कृतिक विभागात तीच परिस्थिती आहे, जर असं केलं तर सांस्कृतिक मंत्री त्यालाच बनवायचं, त्याचा कलेशी संबंध आहे,
संस्कृती विभागात त्यालाच अपॉइंट करायचं त्याला क्लासिकल डान्स येतो, तो एक कलाकार आहे, आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेशन पण येतं”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.