Abhidnya Bhave Husband Mehul Pai : अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही स्वामी भक्त आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री अभिज्ञा भावे. अभिज्ञा भावे स्वतः स्वामी भक्त आहेच, शिवाय तिचा पती मेहुल पै याचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थांवरील याच श्रद्धेमुळे मेहुल मठात जातो आणि असंच १९ एप्रिल रोजी मेहुल मठात गेला असता त्याला एक अनोखा अनुभव आला.
अभिज्ञा भावेच्या पतीने सांगितला स्वामींच्या दर्शनाचा अनुभव
मेहुल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो शेअर करत असतो. अशातच त्याने १९ एप्रिल रोजी स्वामींच्या मठात आलेल्या अनोख्या अनुभवाची खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, आजचा माझा दिवस आणि अनुभव. १९ एप्रिलचा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता.”
भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शून गेलं.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता आणि तेव्हा जाणवलं की, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, “मी आधी स्वामींच्या पाया पडतो. मग तू पाया पड.” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शून गेलं.”
सांगता येणारा आत्मिक संवाद झाला
यापुढे मेहुलने असं म्हटलं आहे की, “मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत, गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, “थोडा वेळ थांबशील का मी उपासना करे पर्यंत? मी थांबलो आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं, “घरी कोण-कोण आहे रे तुझ्या?” मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर ते म्हणाले, “येत्या २४ एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग आणि मग परत मठात ये.”
“साधा वाटणारा एक प्रसंग स्पर्श करून गेला”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “इथेच स्वामींपुढे ती ठेव आणि बघ लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” थोड्या वेळाने, ते हसत म्हणाले, “तू कुठे चाललायस?” आणि शेवटी हळुवारपणे विचारलं, “थोडं पुढे रस्ता क्रॉस करून देशील का?” असं झालं स्वामींचं दर्शन. एक साधा वाटणारा प्रसंग. पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करून गेला.”
“स्वामींशी जोडले गेलेले क्षण आयुष्यभरासाठी घर करतात”
यानंतर मेहुलने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते. स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही.” दरम्यान, मेहुलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.