Abhijeet Sawant on Suraj Chavan: सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता ठरला असून अजूनही त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असलेले पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्याने सहानुभूती मिळवून हे पर्व जिंकले आहे, असेही म्हटल्याचे पाहायला मिळाले होते. आता या पर्वाचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंतने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

“मला पहिल्या दिवसापासून विश्वास…”

अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सूरज चव्हाणबद्दल बोलताना अभिजीत सावंतने म्हटले, “शोमध्ये असताना मी नेहमी म्हणायचो की मी सूरजबरोबर कनेक्ट करू शकतो. त्याला समजू शकतो. कारण- मी ज्यावेळी इंडियन आयडलमध्ये होतो, तेव्हा मीदेखील असाच होतो. मी शहरातला मुलगा होतो आणि सूरज एका गावातील मुलगा आहे, फक्त हाच फरक होता. पण अजाणतेपण तेवढंच होतं. गोष्टींची जी समज असते, ती जेवढी त्याला आता आहे, त्यावेळी मलादेखील तितकीच होती. त्यामुळे मी सगळ्यांना हे सांगायचो की त्याला कळत नाही, असं बोलू नका. त्याला स्वत:ला शिकू द्या. समजू द्या या गोष्टी. कारण-तुम्ही त्याला पाठीशी घालू शकत नाही. म्हणून मी त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचो. त्याला माझा नेहमीच पाठिंबा होता.”

अनेकांनी सूरजला ट्रॉफी दिल्याने शोचे नाव सिंपथी शो असे ठेवावे, असे म्हटले होते. यावर तुझं मत काय आहे. यावर बोलताना त्याने म्हटले, “मला कधीच वाटलं नाही की सूरज सिंपथी गेम खेळतोय. मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की, सूरज चांगला खेळाडू आहे आणि तो आणखीन चांगला झाला असता. तुम्ही शेवटी शेवटी बघा, मी, सूरज, निक्की, जान्हवी, आम्ही चौघांनी मिळून किती चांगला क्षण निर्माण केला आहे. ज्यामध्ये तो त्याचे डायलॉग म्हणतो आणि आम्ही सगळे झापूक झुपूक म्हणत आहोत. तो व्हिडीओ व्हायरल झाला. असे किती क्षण होते, जे सूरज आणखी करू शकला असता. पण त्याला नेहमी तू असं करू नको, अरे तुला कळत नाही असे म्हटले जात होते.”

“आपण ना एक चौकट ठरवतो. पण आपण का ठरवतो एखाद्यासाठी चौकट?मी या गोष्टींबद्दल नेहमी म्हणायचो आणि ते चूकीचं होतं असं मला नेहमी वाटायचं आणि म्हणून मला वाटतं की तो कधीही सिंपथी गेम खेळलाच नाही. या लोकांनी बनवल्या त्या गोष्टी. बाकीच्यांनी बनवलं की याला सिंपथी वोट मिळत आहे”, असे म्हणत अभिजीतने आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’चा पहिला कॅप्टन झाला ‘हा’ सदस्य; असा पार पडला कॅप्टन्सीचा टास्क

दरम्यान, सूरज चव्हाणनेदेखील एका मुलाखतीत, “अभिजीत दादाने मला खूप पाठिंबा दिला. मला गोष्टी समजावून सांगितल्या”, असे म्हणत त्याचे कौतुक केले होते. आता बिग बॉसमधून बाहेर पडलेले हे सदस्य विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.