अभिनेते किरण माने हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेही आहेत. त्यांच्या विविध पोस्टमुळे आणि वक्तव्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी वारीबाबत एक पोस्ट लिहिली आहे. संतांनी वारी काही टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती असं किरण मानेंनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

“वारी ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची खूप प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडून आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.

हे पण वाचा- किरण मानेंची पोस्ट, “आजही पूर्वीप्रमाणेच तुकोबा आणि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या..”

या दर्ग्यात भजन आणि नमाज दोन्ही अदा होतं

…विशेष म्हणजे या काळात या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात !! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनात, मेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं आहे…

किरण माने

९ दिवसांपूर्वीच किरण मानेंनी अनगडशा फकिराचं उदाहरण देत सरकारला टोला लगावला होता. तसंच नीट परीक्षेच्या गोंधळावरुन आणि लोकसभेत राहुल गांधींनी जे भाषण केलं त्यावरुनही त्यांनी पोस्ट केल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मुस्लीम धर्म आणि हिंदू धर्माची सांगड घालत ती परंपरा वारीत कशी जपली गेली हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane post about pandharpur waari what did he say scj
Show comments