NEET परीक्षेच्या वादात आता अभिनेते किरण माने यांनी उडी घेतली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांवरुन त्यांनी एक पोस्ट लिहून सरकारला लक्ष्य केलं आहे. NEET चा गोंधळ देशात सुरु आहे. पेपरफुटी आणि पीजी परीक्षा रद्द होणं यावर राहुल गांधींनीही संताप व्यक्त केला आहे. तसंच या सगळ्या घोळाला केंद्र सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. आज शिक्षणमंत्री जेव्हा खासदारकीची शपथ घेण्यासाठी आले तेव्हाही नीटच्या घोषणा विरोधकांनी दिल्या.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.

एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??

हे पण वाचा- “गृहमंत्री महोदय राजीनामा द्या, सोडा खुर्ची…”, वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या, किरण माने संताप व्यक्त करत म्हणाले…

इकडे आदित्य ठाकरेंनी ‘अँटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी’ असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली… तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं… लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली !

आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. ‘अँटी पेपर लीक’ कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे.

पण… एवढंच पुरेसं आहे का?

विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीअरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्‍या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा.

या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्‍यांना ‘हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद, ‘ यापलीकडे किहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. ‘काबिल’ माणूस बसवा खुर्चीवर.

जय शिवराय… जय भीम.

किरण माने

असं म्हणून किरण मानेंनी ही पोस्ट केली आहे. तसंच देश चालवणं म्हणजे मंदिर चालवणं नाही असं म्हणत सरकारला सुनावलं आहे.