१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. सध्या ‘सीआयडी’चं दुसरं पर्व सुरू आहे. या मालिकेतील आता मुख्य पात्र एसपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एसपी प्रद्युमन साकारणारे शिवाजी साटम यांची एक्झिट होणार आहे. अशातच आता ‘सीआयडी २’ मध्ये शिवाजी साटम यांची जागा घेणाऱ्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. हा अभिनेता पाच वर्षांनी हिंदी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.
‘सीआयडी २’ मधील एक्झिटच्या चर्चेविषयी शिवाजी साटम ‘मिड डे’शी संवाद साधताना म्हणाले की, सध्या मी सुट्टीवर आहे. हे पात्र मालिकेतून बाहेर पडेल की नाही याबद्दल मला कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यात आलेली नाही. तसंच आगामी चित्रीकरणाबद्दलही माहीत नाही. पण, आता ‘सीआयडी २’मध्ये शिवाजी साटम यांची जागा अभिनेता पार्थ समथान घेणार असल्याचा खुलासा झाला आहे. याबाबत पार्थने स्वतः सांगितलं आहे.
‘गॉसिप टीव्ही’च्या एक्स अकाउंटवर पार्थ समथानचा ‘आजतक’ वृत्तवाहिनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पार्थ शिवाजी साटम यांची जागा घेणार असल्याचं सांगताना दिसत आहे. पार्थ म्हणतो, “लहानपणापासून ही मालिका पाहत आलो आहे. अनेकदा लोकांसमोर या मालिकेतील पात्र केली आहेत. ही एक आयकॉनिक मालिका आहे; जी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. जेव्हा मी ‘सीआयडी २’मध्ये काम करणार असल्याची कुटुंबाबरोबर चर्चा केली. तेव्हा त्यांना वाटलं की, मी गंमत करतोय. पण, मी त्यांना पुन्हा सांगितलं. त्यावेळी त्यांना खूप अभिमानास्पद वाटलं. त्यामुळे आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे.”
पुढे पार्थ समथान म्हणाला की, मी आता एसीपी आयुष्मान म्हणून एसीपी प्रद्युमनची जागा घेत आहे. नवी भूमिका आणि नवीन कथा आहे. तसंच नव्या थ्रिलर, सस्पेंससह ही कथा पुढे पाहायला मिळणार आहे. माझ्याबरोबर असं काही होईल, याचा मी कधीच विचार केला नव्हता. मी याआधी जी काही काम केलेत. मग ते ‘कैसी ये यारियां’ असो किंवा ‘कसोटी जिंदगी की २’ असो यामध्ये रोमँटिक भूमिका केल्या होत्या. आता थ्रिलर, सस्पेंस अशा मालिकेत मी काम करत आहे. ही मालिका लहान मुलांपासून सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी खूप नशीबवान आहे, ‘सीआयडी २’ मालिकेचा भाग झालो आहे.”
दरम्यान, पार्थ समथानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर. त्याने ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या मालिकेत तो पृथ्वी सान्यालच्या भूमिकेत दिसला होता. पण ‘कैसी ये यारियां’मधील माणिक मल्होत्राच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला नवीन ओळख मिळाली. यामध्ये त्याच्याबरोबर नीति टेलर दिसली होती. या मालिकेचे पाच सीझन प्रदर्शित झाले आहेत. यानंतर, पार्थ एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की २’ मध्ये अनुराग बसूच्या भूमिकेत दिसला. मग २०२४ मध्ये ‘घुडाचढी’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात संजय दत्त, खुशाली कुमार, रवीना टंडन आणि अरुणा इराणी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.