भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यावर सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव करत भारताने जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. हा अंतिम सामना जिंकल्यावर सगळ्याच भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केलं पण, या सगळ्यात भारतीय संघाचा हेड कोच राहुल द्रविडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रॉफी स्वीकारल्यानंतर भारतीय संघासह द्रविडने भन्नाट सेलिब्रेशन केलं याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघासह सध्या कोच राहुल द्रविडवर देखील कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. संघाच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहून त्याने देखील गेली अनेक वर्षे या आयसीसी ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहिली होती. सर्व स्तरांतून राहुल द्रविडचं कौतुक करण्यात येत आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी अभिनेत्री अदिती द्रविड व राहुल द्रविड एकमेकांचे नातेवाईक आहेत. राहुल द्रविड अदितीचा काका आहे. त्यामुळे या ऐतिहासिक विजयानंतर पुतणीने आपल्या काकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी

राहुल द्रविडचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ शेअर करत अदिती लिहिते, “या माणसासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या ११ खेळाडूंसाठी मी प्रचंड आनंदी आहे. इंडिया…इंडिया” यापुढे अभिनेत्री भावुक झाल्याचे इमोजी जोडले आहेत. याशिवाय हा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी अदितीने खास हटके अंदाजात सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या होत्या. “आज आपला अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना मी लाइव्ह हरताना पाहिलाय आणि ते दु:ख अजूनही आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकलो तर ते दु:ख हलकं होईल. भारतानेच सामना जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. टीम इंडियाला माझा पूर्ण सपोर्ट आहे.” त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकल्यावर अदितीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हेही वाचा : T20 World Cup : अनुष्काला व्हिडीओ कॉल करताच विराटला अश्रू अनावर! ऐतिहासिक विजयानंतर किंग कोहली झाला भावुक

दरम्यान, बार्बोडोसमध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. विराट कोहलीच्या ७६ धावा अन् त्यानंतर बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने यंदाच्या टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. विराट कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला.