Bigg Boss Marathi 5 वे पर्व कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे, स्पर्धकांमधील भांडण आणि वाद-विवादामुळे, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची शाळा घेतल्यामुळे हे पर्व सातत्याने चर्चेत आहे. याबरोबरच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची एकमेकांबरोबर जी समीकरणे असतात, त्याचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. अरबाज आणि निक्कीविषयीदेखील मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. आता नुकताच अरबाज पटेल कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडला आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी या सगळ्यातून तू बाहेर आला आहेस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने म्हटले, “आता तर बाहेर आलो नाही, थोडा वेळ लागेल. ६० दिवस मी आतमध्ये होतो तर इतक्या लवकर बाहेर येऊ शकत नाही आणि आतमध्ये माझा जीव अडकलेला आहे, तर तो बाहेर आल्यावर मी बाहेर येईन”, असे म्हटले.

पुढे त्याने म्हटले, “जे लोक मला निक्कीविषयी बोलत आहेत. तर मला वाटतं की ठीक आहे, जी मुलगी तुम्हाला आवडते, तिच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करता, त्यात चुकीचे काय आहे.”

अरबाज मैत्री, प्रेम फक्त गेमसाठी करतो असे म्हटले जात होते. याआधी त्याने जो शो केला होता, त्यामध्येदेखील असेच दिसले होते. यावर बोलताना त्याने म्हटले, “मी ज्यांच्याबरोबर बसतो, बोलतो, त्यांना मी आवडतो, लोक माझ्याशी जोडले जातात, त्यात माझी काही चूक नाही. मी याआधी शो केला होता, तो माझा पहिला शो होता. तो पूर्ण शो बघा, तिथे मी तुम्हाला टास्कमध्येच दिसत होतो. इतर ठिकाणी दिसलो नाही. तसं जर दिसलो असतो आणि लोक मला म्हटले असते की तू लव्ह अँगल दाखवलाय किंवा समोरच्या व्यक्तीला प्रेम दाखवलंय. तिकडे पार्टनरचा गेम होता. निक्कीबरोबर वेगळे आहे, तिच्यासाठी माझ्या मनात भावना आहेत.”

हेही वाचा: १.६ कोटींची कमाई करणारा ‘हा’ होता बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा, तुम्ही पाहिलाय का?

जेव्हा निक्की आणि तुझ्यामध्ये भांडण झालं होतं, त्या आठवड्यात वेगळा होतास आणि दुसऱ्या आठवड्यात तू वेगळा होतास. ते प्रेक्षकांना आवडलं नाही. यावर बोलताना अरबाजने म्हटले, “त्या घरात निक्की माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती. तिच्याबरोबर माझं मन जोडललं होतं. आमच्या भांडणानंतर वॉशरुममध्ये आमच्यात बोलणं झालेलं. निक्की मला बाळासारखी ट्रीट करते. ते किती लोकांनी बघितलं किंवा दाखवलं माहीत नाही, तर मला वाटलं की आपण नॉर्मल वागू. आपण एकमेकांना टोमणे मारायला नको. जे मला आवडत नाही ते माझ्यासमोर करू नको, माझ्या पाठीमागे करायचं असेल तर करू शकते; असंच आमचं तिथे वॉशरूममध्ये बोलणं झालं होतं. पण, भाऊच्या धक्क्यावर मला जेव्हा सांगितलं की तू सहानुभूतीसाठी करतोय, त्यावेळी संपूर्ण घर माझ्याविरुद्ध झालं. त्यानंतर माझ्याकडे निक्कीने स्वत: येऊन गोष्टी सगळ्या स्पष्ट केल्या. त्यानंतर तिने मला कधीही त्रास दिला नाही. जिथे तुमच्या भावना असतात तिथे थोड्या कुरबुरी असतातच.”

निक्की बाहेर आल्यावर जशी ती घरात होती तशीच माझ्याशी वागली तर आम्ही एकत्र दिसू, असे अरबाजने म्हटले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच अरबाज पटेल कमी मतं मिळाल्यामुळे बाहेर पडला. सूरज चव्हाण, अरबाज पटेल, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.