Air India Ahmedabad Plane Crash Pushkar Jog Post : एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाल्यावर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंडियाचं विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी ( १२ जून ) घडली. या घटनेवर सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. तर, काही लोकांनी विमान प्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने तिला काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने प्रवास करताना वाईट अनुभव आल्याचं म्हटलं होतं. याशिवाय लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी देखील “टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं?” असे प्रश्न अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर उपस्थित केले आहेत. आता लोकप्रिय मराठी अभिनेता पुष्कर जोगने सुद्धा या प्रकरणी भाष्य केलं आहे.
पुष्कर पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी नि:शब्द, निराश झालो आहे. पण, खरंतर या सगळ्यामुळे मनात राग देखील निर्माण झाला आहे. विमान वाहतुकीच्या नियमांचं/कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या भ्रष्ट लोकांना आता उत्तर द्यावं लागेल. खरंतर बोईंग कंपनी आणि एअर इंडियाने याचं उत्तर द्यावं आणि या अपघातासाठी त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात… जुनी विमानं अजूनही सेवेत आहेत, या विमानांना तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्याची आवश्यकता होती. मला तांत्रिक गोष्टी माहिती नाही, माझं विधान चुकीचं असू शकतं पण, खरंच मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. त्या निष्पाप लोकांनी जीव गमावला याचं दु:ख सर्वात मोठं आहे. जे घडलंय ते अतिशय वेदनादायी आहे.”
“एअर इंडियाचे सीईओ, बोईंग आणि डीजीसीएकडून या घटनेवर उत्तरं येणं अपेक्षित आहेत. केवळ शोक व्यक्त करून गेलेले लोक पुन्हा येणार नाहीयेत.” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे एकमेव सुखरुप बचावले आहेत. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमधील २४ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत.