ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर अनेक दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. “राग सारा सोड” या गाण्यावर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ बनवला आहे. “छोट्या भांडणानंतर आम्ही…” असं त्यांनी या व्हिडीओवर लिहिलंय. या व्हिडीओत ऐश्वर्या रागावलेल्या दिसतायत आणि अविनाश त्यांचा राग घालवण्यासाठी हे गाणं गाऊन त्यांचा राग शांत करतायत.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. “नवरा बायकोमधल्या गोष्टी..” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. अगदी काहीच वेळात या व्हिडीओला ३८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… बाबा झाल्यावर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, लेकीच्या जन्माची दिली गुड न्यूज, म्हणाला…

या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “भारी आहे हे, आजच ट्राय करते माझ्या धन्याबरोबर”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लाडी गोडी किती गोड ही जोडी.”

“राग काढणारं कोणी असेल तर रागावण्यात मज्जा आहे…, तू खूप लकी आहेस”, अशी कमेंट ऐश्वर्या नारकर यांच्यासाठी एका चाहतीने केली; तर एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जोडी नंबर-१.”

हेही वाचा… सुजलेला चेहरा, बोटॉक्स अन्.., दर दुसऱ्या दिवशी उर्फीला होते अ‍ॅलर्जी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, “मला फक्त सहानुभूती…”

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचक या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत; तर सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत अविनाश नारकर शेवटचे झळकले होते.