Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील सदस्य हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्पर्धकांच्या वागण्या-बोलण्याचे पडसाद बाहेरच्या जगावर पडताना दिसतात. प्रेक्षक, कलाकार यांबरोबरच स्पर्धकांचे कुटुंबातील सदस्यही त्यावर व्यक्त होताना पाहायला मिळाले आहे.

आता अरबाज पटेलच्या वडिलांनी तो बिग बॉस मराठीच्या घरात असताना मुलाखतीमधून आपले मत व्यक्त केले होते. अरबाज पटेल गेल्या आठवड्यात कमी मते मिळाल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला आहे. आता तो बाहेर आल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी निक्कीविषयी वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले अरबाजचे वडील?

अरबाजच्या वडिलांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी निक्कीबाबत म्हटले, “जेव्हा एखाद्या घरात आपण दोन महिने राहतो. त्यावेळी मैत्री होते, बॉण्डिंग होते. त्यामुळे सवय होते. ज्या व्यक्तीची सवय झाली आहे, ती व्यक्ती अचानकच जात असेल, तर वाईट वाटणं साहजिकच आहे. येताना ती रडत होती. तिच्या त्या भावना खऱ्या होत्या, असं वाटतं; परंतु मैत्री आणि लव्ह अँगल यात फरक आहे.”

“अरबाज मला आता बोलला तेव्हा मला कळलं की निक्की आणि त्याची बॉण्डिंग कशी होती. पण तेव्हा मला माहीत नव्हतं, मलाही खूप राग यायचा, वाटायचं की अरबाज हे काय करतोय, निक्कीमुळे गेम खराब करतोय आणि निक्की त्याचा फायदा करून घेतेय. मी तुम्हाला याआधी मुलाखत दिली होती. त्यामध्ये निक्की अशी आहे वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण, अरबाज बाहेर आल्यानंतर मला बोलला की, पप्पा असं नसतं. तिथे राहिल्यानंतर सगळं समजतं. तुम्हाला एक बाजू दिसते;दुसरी बाजू दिसत नाही. एक बाजू दाखवली आहे. तुम्ही माझी काळजी घ्यायचा, तशी तीदेखील माझी काळजी घ्यायची. चांगलं-वाईट बोलायची. गेम प्लॅनिंग असो; पण दिसत नाही सगळं. जेव्हा आमचं भांडणदेखील झालं, तेव्हा तिनं स्वत:हून माफी मागितली आणि मला म्हटली की, आपण चांगला गेम खेळू, चांगले राहू. आमची चांगली बॉण्डिंग झाली होती.”

अरबाज पटेल बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या वडिलांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी निक्की आणि अरबाजबद्दल बोलताना म्हटले होते, “अरबाजनं एवढ्या मोठ्या शोमध्ये कमिटेड असल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला त्याची निक्कीबरोबर जवळीकतादेखील दिसतेय. तर, ते फेक वाटत आहे. अरबाजनं तसं केलं नाही पाहिजे.”

हेही वाचा: “चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

दरम्यान, अरबाज पटेलने स्वत: कमिटेड असल्याचे सांगितले होते; मात्र निक्कीबरोबर त्याची जवळीकता वाढतना दिसत होती. त्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड लीझा बिंद्रानेदेखील सोशल मीडियावर अरबाजसाठी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठी चर्चा होताना दिसत होती.

आता घराबाहेर आल्यानंतर अरबाजने निक्की त्याची खूप काळजी घ्यायची. त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडला गेलो, असे सांगितले आहे. आता निक्की तांबोळी बाहेर आल्यानंतर त्यांच्यात काय समीकरण असणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.