Bigg Boss Marathi 5 च्या पाचव्या पर्वातील सदस्य मोठ्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे फक्त बिग बॉसच्या घरात असतानाच नव्हे, तर बाहेर पडल्यानंतरही या स्पर्धकांची मोठी चर्चा होताना दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची सातत्याने चर्चा होताना दिसते. गेल्या आठवड्यात अरबाज पटेल(Arbaz Patel) बिग बॉस मराठी ५ च्या घरातून कमी मतं मिळाल्यामुळे बाहेर पडला. मात्र, त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्याने एका पॉडकास्टमध्ये त्याची प्रेमाची व्याख्या काय आहे हे सांगितले आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला तुझी प्रेमाची व्याख्या काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अरबाज पटेलने म्हटले, “प्रेमाकडे मी फार संवेदनशील दृष्टिकोनातून बघतो. मला माहीत आहे की, मुली संवेदनशील असतात; त्यामुळेच जास्त मुली माझ्याशी जोडल्या जातात. कारण माझा स्वभाव काळजी घेणारा आहे.”

पुढे बोलताना अरबाजने म्हटले, “जसे सगळ्यांनी बघितले की मी खूप रागीट स्वभावाचा आहे. जे रागीट स्वभावाचे असतात, त्यांना लहान बाळासारखे सांभाळू शकेल असे कोणीतरी पाहिजे असते. कारण लहान मुलंसुद्धा खूप हट्टी असतात आणि त्यांना प्रेमानेच समजावले जाऊ शकते; तर माझी अशी अपेक्षा आहे की, लहान बाळांवर जसे प्रेम केले जाते तसे कोणीतरी माझ्यावर प्रेम करावे.”

तुला जेव्हा वाईट स्वभावाचे म्हटले जाते, त्यावेळी तू त्याचे कसे समर्थन करतोस? असा प्रश्न विचारल्यावर अरबाजने म्हटले, “मी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, कारण मला माहीत आहे की मी कसा आहे आणि माझ्या काय अपेक्षा आहेत. लोकांनी बघितले आहे की मला जी व्यक्ती आवडते तिला दुसरी कोणतीही व्यक्ती आवडत नाही. संपूर्ण सीझनमध्ये लोकांनी बघितले आहे, मग ती मैत्री असो किंवा इतर गोष्टी असो.”

“बिग बॉसच्या घरात असताना मला डोअरमॅट आहे असे म्हटले गेले, पण त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मला माहीत आहे की माझी पद्धत कशी आहे, लोकांना खरे काय ते कळतेच”, असेही अरबाज पटेलने म्हटले आहे.

हेही वाचा: ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झालेले भावूक; आठवण सांगत म्हणालेल्या….

दरम्यान, अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याच्या आणि निक्कीच्या जवळीकतेबद्दल मोठ्या चर्चा झाल्या. याविषयी बाहेर आल्य़ावर बोलताना अरबाजने म्हटले होते की, जर निक्की बिग बॉस मराठीच्या घरात माझ्याशी जशी वागत होती, तशीच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर वागली तर आम्ही एकत्र दिसू. मात्र, नुकतेच निक्कीच्या आईने तिला सांगितले की अरबाजचा साखरपुडा झाल्याचे बोलले जात आहे. त्यावर निक्कीने अरबाजच्या सगळ्या गोष्टी गोळा करून बिग बॉसला फेकून द्यायला सांगितल्याचे पाहायला मिळाले. आता जेव्हा निक्की तांबोळी घराच्या बाहेर येईल तेव्हा अरबाज तिला स्पष्टीकरण देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.