Bigg Boss Marathi 5 च्या घरातून अरबाज पटेल नुकताच प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने मुलाखतींमधून अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ज्या जोडीची सर्वांत जास्त चर्चा झाली, ती जोडी निक्की आणि अरबाजची होती. त्यांच्यातील नात्याबद्दल, बॉण्डिंगबद्दलही त्याने वक्तव्य केले आहे. आता त्याने रितेश देशमुखबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

‘व्हायरल बॉलीवूड’शी बोलताना त्याने रितेश देशमुखविषयी म्हटले, “मी जेव्हा एलिमिनेट झालो तेव्हा तिथे रितेशभाऊ नव्हते. त्यामुळे मला खूप दु:ख झाले. बिग बॉस मराठी ५ चा अंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यावेळी मी त्यांना भेटेन, खूप गोष्टी बोलायच्या आहेत. मी बाहेर येऊन बघितलं की, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शो होस्ट केला. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शोचा टीआरपी चांगला आला आहे”, असे म्हणत रितेश देशमुखचे त्याने कौतुक केले आहे.

याबरोबरच अरबाज पटेलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांविषयी बोलताना म्हटले, “बिग बॉसच्या घरात ज्यांच्याशी भांडणे झाली आहेत, ती बाहेर असणार नाहीत. कारण- तो एक खेळाचा भाग होता. खरं जग हे वेगळं आहे. बाहेर मी सगळ्यांबरोबर बोलेन, त्यांना भेटेन.

म्युझिक व्हिडीओ कधी येणार येणार, असे विचारताच अरबाजने, “निक्की बाहेर येऊ दे. आम्ही मिळून म्युझिक व्हिडीओ करू”, असे म्हटले आहे.

हेही वाचा: अखेर ‘तो’ क्षण आलाच! पत्नी व मुलींना पाहून अभिजीत झाला भावुक, गायकाच्या लेकीची Bigg Boss ला गोड विनंती, म्हणाली…

अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. पहिल्याच आठवड्यात घरात गट तयार झाले. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण व अरबाज पटेल हे एका ग्रुपमध्ये होते. निक्की आणि त्याच्या मैत्रीचीदेखील मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. कारण- त्याने कमिटेड असल्याचे सांगितले होते; मात्र निक्कीबरोबर त्याची जवळीकतादेखील दिसत होती. आता बाहेर आल्यानंतर त्याने निक्की त्याची खूप काळजी घ्यायची, त्या घरात ती त्याच्यासाठी ‘कन्फर्ट झोन’ होती, असे निक्कीबाबत बोलताना त्याने म्हटले आहे. ती बिग बॉस मराठी ५ मधून बाहेर आल्यानंतर तिथे जशी वागत होती, तशीच वागली, तर आम्ही एकत्र दिसू, असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, बिग बॉसचे पाचवे पर्व ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे आता कोणता स्पर्धक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत ट्रॉफी आपल्या नावावर कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.