Bigg Boss Marathi 5 च्या घरात चर्चेत राहिलेला स्पर्धक म्हणजे अरबाज पटेल हा होय. त्याच्या टास्कमुळे, निक्कीबरोबर असलेल्या नात्यामुळे किंवा जान्हवी-वैभवबरोबरच्या मैत्रीमुळे तो कायम चर्चेत राहिला. फक्त बिग बॉसच्या शोमधील त्याच्या गोष्टींमुळेच नाही तर घराबाहेर त्याच्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या.

अरबाज पटेल काय म्हणाला?

‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सहभागी होण्याआधी अरबाज पटेल ‘स्प्लिट्सविला १५’ या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये नायरा अहुजा त्याची पार्टनर होती. हा शो संपल्यानंतर अरबाजने फसवणूक केली, तो खोटे वागला, असे नायराने म्हटले होते. बाहेर त्याची गर्लफ्रेंड आहे हे त्याने मला सांगितले नव्हते. त्यांचा साखरपुडा झाल्याचाही शक्यता असल्याचे नायराने मुलाखतीदरम्यान म्हटले होते. शोसाठी, गेमसाठी अरबाज मुलींचा वापर करतो, ‘बिग बॉस मराठी ५’ मध्येदेखील निक्कीबरोबर तो असेच वागत आहे, असे नायराने म्हटले होते. त्यामुळे अरबाज पटेलच्या मोठ्या चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता अरबाज पटेलने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: आयुष्यात सुनीता असूनही ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात साखरपुडाही मोडला होता अन्…

अरबाज पटेलने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. यावेळी स्प्लिट्सविला १५’ मधील स्पर्धकाने तुझ्याविषयी बोलताना तू प्रसिद्धीसाठी मुलींचा वापर करतोस, असे म्हटले आहे. यावर तुला काय वाटत?या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, “त्या शोमध्ये माझ्यामुळे तुम्ही कोणताही टास्क हारला आहात, असं झालं नाही. माझ्यामुळे तुम्ही सगळे टास्क जिंकला आहे. मी कायम सेफ असायचो, माझ्यामुळे आयडल मॅच बनून तुम्हीदेखील सेफ होत होता. असे पाहायला गेले तर माझाच वापर केला गेला आहे. मी कोणाचा वापर केला नाही किंवा कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही. मी आधी म्हणालो तसं सगळीकडे माझाच वापर होतो पण लोकांना वाटते मीच दुसऱ्यांचा वापर केला आहे. कारण मी मुलगा आहे, मुलीने मुलाबद्दल असे काही सांगितले तर खरेच वाटते. मुलाने मुलीसाठी किती चांगल्या गोष्टी केल्या तर त्या दिसत नाहीत”, असे म्हणत अरबाजने स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, अरबाजने ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात कमिटेड असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर शोमध्ये निक्कीबरोबर वाढलेल्या जवळीकतेवर मोठी चर्चा झाली. बिग बॉसमधून एलिमिनेट झाल्यानंतर अरबाजने निक्की बाहेर आल्यावर त्यांच्या नात्याबद्दल ते निर्णय घेतील असे म्हटले होते.