Bigg Boss Marathi 5 मधून नुकताच बाहेर पडलेला सदस्य म्हणजे अरबाज पटेल हा आहे. घरात असताना तो त्याच्या खेळामुळे मोठ्या चर्चेत होता. सध्या तो त्याच्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, तू या बिग बॉस मराठीच्या शोमधून काय शिकला? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्याने म्हटले, “मी स्वत:ला कायम हिरो समजत होतो, कारण मी स्वत:वर प्रेम करतो. ज्यावेळी मी आरशासमोर उभा राहायचो, त्यावेळी स्वत:ला सांगायचो, तू हिरो आहेस. पण, मी कधी स्वत:ला स्क्रीनवर बघितले नव्हते. व्हिडीओ, रील वैगेरे बनवतो तर ते नॉर्मल होतं. मला बघायचे होते की मी खरंच हिरो आहे का? जसा मला प्रवास हवा आहे, तसा तो मी बनवू शकतो का? तर जेव्हा मी इव्हिक्ट झालो, मला माझा प्रवास दाखवला. माजी एन्ट्री झाली तेव्हा बघितलं नव्हतं की मी कसा दिसत होतो.”

पुढे बोलताना तो म्हणतो, “जेव्हा तो पूर्ण व्हिडीओ बघितला तेव्हा दिसत होते, याची एक हिरॉइन आहे, समोर खूप शत्रू आहेत. सगळे विरुद्ध आहेत, मग ते बाहेरचे लोक असो किंवा आतील लोक असोत. मला जसा प्रवास पाहिजे होता तसा तो मला दिसला.”

“लोक म्हणत होते की रागीट आहे, याला राग खूप येतो. पण, तरुण वयात हे होतंच. मला एकच गोष्ट चुकीची वाटली, ती म्हणजे माझ्या भावना. कारण मी खूप रडलो आहे. लोकांना वाटतं की इतका स्ट्राँग दिसणारा मुलगा इतका रडतो आहे, त्याच्या भावना खऱ्या आहेत की खोट्या आहेत.”

हेही वाचा: Pravin Tarde : धर्मवीर २ बाबत सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, प्रवीण तरडेंचं रोखठोक उत्तर; “आधी सिनेमा…”

अरबाज याविषयी अधिक बोलताना म्हणतो, “त्यावेळी वाटलं की रागाचा कोणी फायदा घेणार नाही. रागामुळे सगळे दूर होतील. मात्र, भावूक झालो तर त्याचा फायदा घेतील; त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवायला पाहिजे”, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठीचे ५ वे पर्व सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या कुटुंबाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी सर्वच स्पर्धक भावूक झाल्याचे दिसले. आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कोणता कल्ला पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.