Bigg Boss Marathi 5 च्या घरातून अरबाज पटेल नुकताच बाहेर पडला आहे. घराबाहेर पडल्यानंतर त्याने अनेक खुलासे केले आहेत. याबरोबरच निक्की आणि आर्याच्या भांडणात नेमके काय झाले होते, याचादेखील त्याने खुलासा केला आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याला आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली होती, तेव्हा तू तिथे होतास, नेमकं काय घडलं होतं? यावर बोलताना अरबाजने म्हटले, “त्यांनी दरवाजा बंद केला होता. निक्कीने मला म्हटलं की अरबाज मला दरवाजा उघडून दे. मी दरवाजा उघडला आणि निक्कीला आतमध्ये पाठवलं. आर्याने निक्कीला पुन्हा ढकललं. त्यानंतर मी निक्कीला इकडून ढकललं. ती निक्कीला ढकलत होती, तर निक्की तिला धक्का देत होती आणि त्यातच तिचा हात आर्याला लागला. तर आर्याला वाटलं की मारलं आणि आर्याने मी तुला मारेन असं म्हणत निक्कीला मारलं आणि ते मी स्पष्ट बघितलं आहे. आर्यापण म्हणत होती की निक्कीने मारलं. मी तर बिग बॉसला सांगितलेलं की दोघींनी मारलं असेल तर दोघींना बाहेर काढा. पण, जेव्हा बिग बॉसने बघितलं तेव्हा आर्याने मी मारेन असं म्हणून निक्कीला मारलं होतं, तर ते वाईटच होतं.”

जादुई हिऱ्याच्या टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच भांडणात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे शिक्षा म्हणून तिला घराबाहेर पडावे लागले होते. यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ठरवलं होतं होणाऱ्या बाळाचं नाव

अरबाज पटेलने घराबाहेर आल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. निक्कीबरोबरच्या मैत्रीवरदेखील तो बोलला आहे. जर निक्की घरात माझ्याशी जशी वागत होती, तशीच बाहेर आल्यावर वागली तर आम्ही एकत्र दिसू असे त्याने म्हटले.

दरम्यान, बिग बॉस मराठी ७० दिवसात निरोप घेणार आहे. आता घरात असलेल्या सदस्यांपैकी कोणता सदस्य प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच या आठवड्यात धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणता कल्ला होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.