‘खतरों के खिलाडी १३’ व ‘बिग बॉस १६’ मध्ये झळकलेली अभिनेत्री अर्चना गौतमला मारहाण झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. ती दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात गेल्यावर तिला व तिच्या वडिलांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली असा आरोप तिने केला होता. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. याप्रकरणी अर्चनाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. पण तिने तिची बाजू मांडत काही गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्चना गौतम म्हणाली, “मी वर्षभरापासून काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली नव्हती, त्यामुळे जायचं ठरवलं. मी तिथे जातेय याबद्दल प्रियांका गांधींचे पीए ठाकूर संदीप सिंह यांच्या पीएला सांगितलं होतं. मी सांगितल्यावर त्यांनी प्लॅन केला आणि लखनऊवरून बायका बोलावल्या. मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी गेले होते, पण तिथे पोहोचताच त्या महिला मला मारू लागल्या. मी त्यांना कारण विचारत होते, पण कोणीच काही सांगितलं नाही आणि मला मारणं चालू ठेवलं. मला कसंबसं माझे वडील वाचवत होते. त्यावेळी कोणीच माझी मदत केली नाही, ते सगळे संदीप सिंह यांच्या सांगण्यावरून मला मारत होते,” असे आरोप अर्चनाने ‘टेलिटॉक इंडिया’शी बोलताना केले.

बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? अभिनेत्रीने केले ‘हे’ आरोप

“मी कधीच पक्षाबद्दल, प्रियांका गांधी, राहुल गांधींबद्दल वाईट बोलले नाही. मी बिग बॉसमध्येही त्यांच्याविरोधात काहीच ऐकून घेतलं नव्हतं. संदीप सिंहने यापूर्वी रायपूरमध्ये माझ्याबरोबर गैरवर्तन केले होते. माझ्या वडिलांनी तक्रार दिली होती, पण त्याने ती तक्रार उत्तर प्रदेशहून छत्तीसगडला ट्रान्सफर केली होती,” असं अर्चना गौतम म्हणाली.

पक्षविरोधी कारवायांमुळे अर्चना गौतमीची तीन महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून झाली होती हकालपट्टी

काँग्रेस कार्यालयात घडलेल्या घटनेचा उल्लेख करत अर्चना म्हणाली, “त्या महिलांनी माझ्या म्हाताऱ्या वडिलांना मारलं. माझे केस ओढले, ओढणी ओढली. मला मारणाऱ्या महिलांना स्वतःची मुलं असतील, बहीण असतील ना. त्यांनी मारण्याआधी काहीच विचार केला नाही. माझ्या ड्रायव्हरचं डोकं फोडलं, ते मी दलित असल्यामुळे मारत होते का? लोक चंद्रावर पोहोचले आहेत. इंडस्ट्रीत असे प्रकार घडत नाही, दुसरे ज्या ग्लासातून पाणी पितात, त्याच ग्लासातून मी पाणी पिते. इतका जातीभेद आता राहिला नाही. पण त्या लोकांना माझी इतकी इर्ष्या वाटते. मला वाटतं त्यांना माझी अडचण नाही तर माझ्या जातीची अडचण आहे. एक दलित समाजाची मुलगी खूप पुढे जातेय, लोकांना प्रेरित करतेय, हे त्यांना बघवत नाहीये. हे चुकीचं आहे, त्यांनी असं करायला नको होतं.”

“बाबासाहेबांनी पाण्यासाठी चळवळ केली होती, ते माझे पूर्वज आहेत, मी हार मानणार नाही. दलित मुलींवर अत्याचार झाले की हे सगळे आंदोलन करतात. पण हे माझ्याबरोबर घडतंय, आता मी गप्प बसणार नाही, सगळ्या गोष्टी पुढे आणेन. मरणाऱ्या मुलींसाठी आंदोलनं करणारे माझ्यासाठी का बोलत नाहीत?” असा सवाल अर्चनाने केला.

“माझ्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती प्रियांका गांधी, राहुल गांधी व सोनिया गांधींना कळावी, असं मला वाटतं. त्यांनी याची दखल घेऊन समिती स्थापन करून चौकशी करायला लावावी अशी माझी विनंती आहे. माझ्या पक्षाची बदनामी होईल, त्यामुळे मी पोलिसांत तक्रार दिलेली नाही, पण पक्षाने संदीप सिंहवर कोणतीही कारवाई केली नाही तर त्याच्याविरोधात तक्रार देणार आहे,” असं अर्चना म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archana gautam allegations on priyanka gandhi pa sandeep singh says they beaten her because of caste hrc