आशा नेगी आणि रित्विक धनजानी ही जोडी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करत असताना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीनं २०२० साली आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आशा नेगीने या नात्यातून बाहेर जो भावनिक संघर्ष अनुभवला त्यावर भाष्य केलं. तसेच ब्रेकअप झाल्यावर चाहत्यांकडून अजूनही त्यांना ज्या नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात त्याबाबत प्रतिक्रिया दिली.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत आशानं सांगितलं की, एकाच मालिकेत काम करणारे अनेक कलाकार एकमेकांना डेट करू लागतात. “तुमच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते त्यामुळे, माझ्या मते, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लोक लगेच एकत्र येतात.” रित्विकबरोबरच्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, “जेव्हा तुमच्या नात्यात कुटुंबीय येतात, तेव्हा सगळं काही सांभाळणं खूप अवघड होतं.”

हेही वाचा…Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं

तो दुःखद काळ

आपल्या रिलेशनशिपमध्ये जर कुटुंबीयांचा सहभाग असेल तर आणि ते नातं तुटलं तर खूप दुःख होतं, आणि मग ही कठीण परिस्थिती तुम्हाला सांभाळावी लागते. हा काळ खूपच दुःखद असतो, असं आशा म्हणाली.

चाहते आजही ट्रोल करतात

“तुम्ही अभिनेय क्षेत्रात असाल तर, तुमच्या चाहत्यांची, फॅन क्लब्सची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे रित्विकबरोबर ब्रेकअप होऊन चार वर्ष झाले तरी चाहते मला अजूनही ट्रोल करतात तसेच ते रित्विकलाही ट्रोल करतात,” असं आशा म्हणाली. आम्ही आमचं नातं लपवून ठेवलं नव्हतं, त्यामुळे जेव्हा आमचं ब्रेकअप झालं तेव्हा आमच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, असं आशाने सांगितलं.

हेही वाचा…अमिताभ बच्चन यांनी एकाच दिवशी ओढल्या होत्या २०० सिगारेट्स; व्यसनाबद्दल बिग बी म्हणालेले, “जे मिळेल ते…”

“सिंगल असल्यावर स्वातंत्र्य मिळतं”

आशा नेगीने सांगितलं की, ती सध्या सिंगल आहे आणि जेव्हा ती पुढच्या नात्यात जाईल तेव्हा त्याबद्दलही स्पष्टपणे बोलेल. “मी खूप रिलेशनशिपमध्ये राहिले. ११-१२वीला असल्यापासून मी नात्यात होते. सुरुवातीला मला वाटलं की, मी कधीच सिंगल राहू शकणार नाही, मी कोणाला तरी शोधेनच. मी नेहमीच कोणाला तरी डेट करत आले आहे आणि मी कधीच एकटी राहणारी व्यक्ती नाही. पण तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला खूप स्वातंत्र्य मिळतं. तुम्ही रिलेशनशिपमधून बाहेर आलात की, एकटं राहणं खूप अवघड असतं. पण जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुमचा विकास दुप्पट होतो, कारण तुम्ही स्वतःकडे लक्ष देत असता,” असं आशा म्हणाली.