Akhilesh Bhagare Wedding : प्रसिद्ध पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा मुलगा अखिलेश भगरे अखेर लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या थाटामाटात अखिलेशचा लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद, साखरपुडा असे सर्व समारंभ पारपंरिक पद्धतीने पार पडले. याचे फोटो आणि व्हिडीओ अखिलेशची बहीण अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
२०२४च्या सुरुवातीलाच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटली. त्यानंतर मे महिन्यापासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. यावेळी अखिलेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. हा मुहूर्त समारंभ घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. यावेळी हळद कुटण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी अखेर अखिलेश बोहल्यावर चढला. वैष्णवी जाधव हिच्याशी अखिलेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवलं.
i

लग्नासाठी अखिलेश भगरे आणि वैष्णवीने खास पारंपरिक लूक केला होता. अखिलेशने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर वैष्णवीने लाल रंगाची साडी नेसली होती. या पारंपरिक लूकमध्ये दोघं खूपच सुंदर दिसत होती.
त्यानंतर अखिलेश आणि वैष्णवीचा गृहप्रवेश देखील मोठ्या थाटामाटात झाला. गृहप्रवेश झाल्यानंतर लक्ष्मी पूजा झाली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी अनघा आणि अखिलेशने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नाव असून भावा-बहिणीने सुरू केलेल्या या हॉटेलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील बरेच कलाकार अनेकदा ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसत असतात.
अनघा अतुलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अनघाने साकारलेली श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे अनघाला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यानंतर ती ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली आहे.