अभिनेता भालचंद्र कदम ज्यांना सर्व जण भाऊ कदम म्हणून ओळखतात, ते अनेक वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होते. आता हा शो बंद झाला असला तरी याची चर्चा अनेकदा होताना दिसते. या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. भाऊ कदम डायलॉग विसरतात, असेही या कार्यक्रमात म्हटले जायचे. यावरदेखील लोक हसत असत. मात्र, भाऊ कदम खरंच डायलॉग विसरतात का? यावर त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

संवाद विसरण्यावर काय म्हणाले भाऊ कदम?

भाऊ कदम यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, भाऊ कदम संवाद विसरतो, असा एक गैरसमज ‘चला हवा येऊ द्या’मुळे पसरलेला आहे. अनेक स्कीटमध्ये निलेश साबळे म्हणायचा, भाऊ संवाद विसरतो, तर तो गैरसमजच आहे का? या प्रश्नाचे भाऊ कदम यांनी हसत हसत उत्तर दिले. त्यांनी म्हटले, “हा गैरसमजच आहे. मात्र एकदा असं झालं होतं. कुठूनतरी दौरा, इव्हेंट करून मी आलो होतो. आम्हाला दोन-तीन तास आधीच स्क्रीप्ट देतात. आदल्या दिवशी आम्हाला स्क्रीप्ट देतात आणि मग आम्ही वाचून दुसऱ्या दिवशी सादर करतो असं होत नाही. तर मी मध्ये असल्यामुळे बाकीची सगळी पात्र येतात आणि माझ्याशी बोलतात. मला सगळ्यांशी बोलायचं होतं. बाकी सगळे मजा करत होते, मला टेन्शन आलं होतं. त्यावेळी एकदा चुकलं होतं आणि मग निलेश तेच वापरायला लागला. मग मी म्हटलं, अरे असं नको. श्रेयासुद्धा म्हणायची, भाऊ चुकत नाही, तो पाठ करतो; निलेश म्हणायचा लोकांना मजा येते, ते आवडतं. त्यामुळे मी संवाद विसरतो हा गैरसमज आहे”, त्यामुळे त्यांच्याबद्दल हा गैरसमज आहे आणि त्यामागची गोष्ट काय आहे हे भाऊ कदम यांनी सांगितले.

‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून भाऊ कदम यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. अनेकविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याच मुलाखतीत त्यांनी जेव्हा शाहरुख खान ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आला होता, त्यावेळची आठवणदेखील सांगितली आहे. त्याने मी साकारलेल्या शाहरुखचे कौतुक केले होते. मात्र, माझ्यासाठी शाहरुख साकारणे ही एक परीक्षाच होती, असे म्हटले आहे.

हेही वाचा: Adar Poonawalla : अदर पुनावाला आता चित्रपट बनवणार, करण जोहरच्या ‘धर्मा’नबरोबर मोठी डील! CEO कोण राहणार?

दरम्यान, भाऊ कदम सध्या ‘सिरियल किलर’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.