Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhao: अमरावतीची रॅपर आर्या जाधव बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून मागच्या आठवड्यात बाहेर पडली. निक्की तांबोळीला मारल्यामुळे बिग बॉसने तिला घरातून निष्कासित केलं. आर्याने निक्की मारल्यावर काही प्रेक्षक तिचं समर्थन करत होते, तर काहींनी तिने नियम मोडला म्हणून टीका केली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर आर्या अमरावतीला गेली होती. त्यानंतर आता ती मुंबईत परतली असून मुलाखती देत आहे.

सात आठवडे बिग बॉसच्या घरात राहिलेल्या आर्याने घरातील तिचे अनुभव ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावेळी अरबाज फार डोकं लावून खेळला, तो जेन्यून असल्याचं वाटत होतं. निक्कीबरोबर फक्त मैत्री आहे असं बोलत होता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला होता, असं आर्या म्हणाली.

हेही वाचा – तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

घरातील सर्वात साधा सदस्य कोण? ज्याला बघून वाटत नाही की तो चालूगिरी करेल किंवा कोणाला हानी पोहोचवेल, असा प्रश्न आर्याला विचारण्यात आला. उत्तरात आर्याने सूरज चव्हाणचं नाव घेतलं. “याचं उत्तर सगळ्यांना माहितीये.. सूरज. तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वात जास्त जेन्यून स्पर्धक आहे. तो भोळा आहे, खरा आहे. त्याला सगळं कळतं. शोच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत तो जसा आहे तसाच वागतोय. तो खरा आहे, तसाच वागतोय,” असं आर्या जाधव म्हणाली.

हेही वाचा – ५३ दिवसांनी वर्षा उसगांवकरांनी गेम बदलला! निक्कीशी हातमिळवणी करत ‘टीम B’मधून एक्झिट, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, सातव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याचं निक्कीशी भांडण झालं. त्यानंतर दोघींमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीवर हात उचलला होता. या चुकीची त्याच दिवशी बिग बॉसने आर्याला शिक्षा दिली होती. तिला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने आर्याला सुनावलं. मग तिला तिची बाजू मांडण्याची संधी दिली आणि शेवटी बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं होतं.