Jahnavi Killekar Apologized her Family: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले आहे. सूरज चव्हाण या शोचा विजेता ठरला, तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. यामधील टॉप ६ सदस्य ग्रँड फिनालेपर्यंत घरात होते. आता बाहेर आल्यावर ते घरातील त्यांचे ७० दिवसांचे अनुभव, त्यांच्याकडून झालेल्या चुका, इतर स्पर्धकांशी झालेली मैत्री याबद्दल सांगत आहेत. जान्हवी किल्लेकरने तिच्याकडून चुका झाल्यावर तिच्या कुटुंबाला ट्रोल केलं गेलं, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवीच्या वागणुकीमुळे तिचा पती, मुलगा आणि इतरांबद्दल लोक जे बोलले त्यावर तिने उत्तर दिलं. “हा शो होता, त्यामुळे सगळे वैयक्तिक माझ्या मुलावर, माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या जाऊबाईंवर गेले, त्याचा नाही आला पण मला कुठेतरी वाईट वाटलं. तुम्ही माझ्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला जज नका करू. प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. माझी फिल्ड वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. त्यामुळे जर एखाद्यात दोष आहे, तर तो त्या व्यक्तीतच आहे,” असं जान्हवी लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाली.

सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

कुटुंबाची माफी मागते – जान्हवी

“बरेच लोक आई-बाबांना पण दोष देतायत, कुठलेही आई-बाबा आपल्या मुलांना वाईट संस्कार नाही देत ना, चांगलेच देतात. ते त्या मुलावर असतं की त्याने संस्कार कसे घेतले आणि काय केलं. त्यामुळे मी जे केलं त्याचा सर्वस्वी दोष माझा होता, त्याच्याशी माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नव्हता. ते मला कायम चांगलंच सांगत आले. मी माझ्या कुटुंबाचीही माफी मागते,” असं जान्हवी म्हणाली.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणचे वय अन् शिक्षण किती? जाणून घ्या

जाऊबाईने जान्हवीला काय म्हटलं?

“मी काल खरंच माझ्या जाऊबाईंची माफी मागितली, पण त्या नाही म्हणाल्या. जान्हवी तू काहीच केलेलं नाहीस, नंतर तू सगळं नीट करून आलीस, असं त्या म्हणाल्या. तसेच तू वाईट वागलीस तेव्हा आम्हाला राग येत होता. माझी जाऊ म्हणाली, ‘मी आतमध्ये येऊन तुला मारलं असतं, जान्हवी तू नाहीयेस अशी, तू का करतेस’ असं अशाच सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. नंतर ते चांगलं वागलीस त्यामुळे आज आम्हाला तुझा अभिमान आहे. पण मी सगळ्यांची माफी मागितली. जशी मी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची माफी मागितली, तशी मी माझ्या घरच्यांचीही मागितली, की माझ्यामुळे त्यांना त्रास झाला”, असं जान्हवीने सांगितलं.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांच्याबरोबर जान्हवी किल्लेकर टॉप ६ मध्ये होती. पण तिने ९ लाख रुपये घेऊन हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती घराबाहेर पडली होती.