Bigg Boss Marathi 5वे पर्व पहिल्या दिवसापासून विविध कारणांमुळे गाजत आहे. आता मात्र हे पर्व चर्चेत असण्याचे कारण म्हणजे घरात वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम चौगुलेचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. घरातील कोणत्या सदस्याविषयी त्याला काय वाटते, टॉप ५ मध्ये कोणते स्पर्धक असतील याबद्दल त्याने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची ओळख करून दिली. त्याबरोबरच त्याला टॉप ५ मध्ये कोणते स्पर्धक असतील आणि ज्यांची नावे घेतली आहेत, ते वरच्या स्थानावर का असतील याची कारणही विचारले आहे.

रितेश देशमुखच्या या प्रश्नावर अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अरबाज पटेल व जान्हवी किल्लेकर हे पाच स्पर्धक अनुक्रमे टॉप ५ मध्ये असतील, असे संग्रामने म्हटले आहे. स्पर्धकांना दिलेल्या क्रमांकाबद्दलची कारणे सांगताना संग्राम म्हणतो की, अभिजीत दोन्ही टीमला सांभाळून चालला आहे. दोन्ही टीममधील स्टॅट्रेजी त्याला कळतात. टीम एमध्ये जहालवादी माणसं आहेत, फक्त त्यांच्यात भांडखोरपणा आहे; पण स्टॅट्रेजी चांगल्या आहेत. टीम बीमधील माणसं भावनिक आहेत. अभिजीतला भावना सांभाळता येतात आणि ज्यावेळी त्याला वाटतं की, आपल्याला काहीतरी धोका आहे, त्यावेळी निक्कीला समोर करून त्याला स्वत:ला वाचवता येतं. त्यामुळे तो पहिल्या स्थानावर येईल, असं मला वाटतंय.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

निक्की तांबोळीविषयी संग्राम म्हणाला की, कोणी वंदा, कोणी निंदा; कॅमेऱ्यासमोर दिसणं हाच माझा धंदा, असं तिचं आहे. त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर येईल. सूरजला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा आहे. त्याचं काम चांगलं आहे, त्याची कामं तो चांगल्या पद्धतीनं करतो. फक्त त्याला लवकर गेम कळत नसल्यानं तो मागे पडतो कधी कधी. परंतु, तो तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारेल, असं मला वाटत आहे.

अरबाज पटेलबद्दल बोलताना संग्राम म्हणाला की, आता ज्या गोष्टी स्क्रीनवर चालल्या आहेत, त्या मलाच नाही, तर कोणालाच आवडत नाहीयेत. हा रिअॅलिटी शो आहे. कुठल्याही एका शोसाठी आपण काहीही करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लोकांना काय दाखवणार आहोत, हे बघितलं पाहिजे. पण, त्याचं फॅन फॉलोईंग जास्त असल्यानं तो चौथ्या स्थानी येऊ शकेल, असे मला वाटते.

हेही वाचा:Bigg Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री! आर्या लाजली, तर अरबाज-निक्की…; पाहा प्रोमो

पाचव्या स्थानासाठी त्याने जान्हवी किल्लेकरचे नाव घेतले. कारण सांगताना तो म्हणाला की, जान्हवीनं पाच आठवडे घालवले आहेत. आता ती कमबॅक करीत आहे. आता ती एकटीच अशी आहे, जी निक्कीला थांबवू शकते.

काय म्हणाले नेटकरी?

संग्रामने टॉप ५ मध्ये ज्या स्पर्धकांची नावे घेतली आहेत, त्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “विरुद्ध नावं घेतली आहेत टॉपमध्ये, सूरज आणि अभिजीत सोडून. कळले तुझे विचार. महाराष्ट्राला अपेक्षा आहेत तू टीम बीकडून खेळावं.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “२९ चा पुन्हा एकदा रिचार्ज वाया घालवणार हा”, आणखी नेटकऱ्याने, “पैसा बरबाद” असे लिहीत संग्रामच्या क्रमवारीवर नाराजी व्यक्त केली आहे.

आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील कोणती समीकरणे बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 wild card entry sangram chougule selected top 5 contestant reveals nikki tamboli game nsp
Show comments