Bigg Boss Marathi Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केल्यापासून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रचंड चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून जान्हवी निक्कीच्या ‘ए टीम’कडून आपला गेम खेळत होती. यादरम्यान, तिची घरातील अन्य सदस्यांबरोबर प्रचंड भांडणं झाली. एवढंच नव्हे तर पंढरीनाथच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर बोट ठेवत तिने त्याचा अपमान देखील केला होता.

जान्हवीने घरात केलेल्या चुकीच्या वक्तव्यांवरून संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पंढरीनाथची तिने माफी मागितली. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिला आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली होती. याचवेळी जान्हवीला तिच्या चुका जाणवू लागल्या आणि निक्कीच्या टीममधून तिने एक्झिट घेतली.

कालांतराने निक्की-जान्हवीची पहिल्या दिवसापासून असणारी मैत्री तुटली आणि दोघींमध्ये वाद सुरू झाले. योग्यप्रकारे गेम खेळण्यास सुरुवात केल्यामुळे रितेशने देखील भाऊच्या धक्क्यावर जान्हवीचं कौतुक केलं. घरात नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जान्हवीला तिच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर ती काय म्हणाली जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi Quiz : निक्की तांबोळी ते ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण; Bigg Boss Marathi 5 बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

जान्हवी किल्लेकरने व्यक्त केली खंत

जान्हवी म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा जेलमध्ये गेले तेव्हा मला वाटलं माझ्याबरोबर हा एवढा मोठा अन्याय का केलाय? पण, दोन दिवसांनंतर मला जाणवलं…महाराष्ट्र आपल्याला बघून तापलाय. एक कलाकार दुसऱ्या कलाकाराशी असं वागतोय हे योग्य नाही. मी खूप चुकले…त्यामुळे मला शिक्षा होणं खूप गरजेचं होतं. नाहीतर, जान्हवी तिच राहिली असती जी बिघडलेली, उद्धट, आगाऊ, खूपच अरेरावी करणारी होती. सगळे मला गुंड बोलत होते. पण, आता मी खूप बदलले आहे. मी मान्य करते… मला राग कमी करता येत नाहीये. पण, शब्द मी नक्कीच विचार करून वापरतेय. हा माझ्यात झालेला सगळ्यात मोठा बदल आहे.”

“मी सुरुवातीला सर्व शोसाठी करत होते आणि तेव्हा माझ्या मनात करिअर संपेल वगैरे असा विचार आला नाही…पण, नंतर या गोष्टी जाणवल्या. मी मूर्खासारखी वागले हे मान्य करते. माझ्या मनात याबद्दल खूप मोठी खंत आहे. आज मला ताईंनी कितीही माफ केलं असलं तरीही मला माहितीये बाहेरची मोठी माणसं मला कधीच माफ करणार नाहीत…मी त्यांच्यासमोर उभीच नाही राहणार… जान्हवी खरंच अशी नाहीये.” असं अभिनेत्रीने सर्वांसमोर स्पष्ट केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi “बिग बॉस ७० दिवसांतच गुंडाळणार…”, तृप्ती देसाईंचा पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना सवाल; म्हणाल्या…

Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकर

जान्हवी शेवटी म्हणते, “निक्की एक सीझन करून आलीये…त्यामुळे तिच्याकडे बघून मी अरेरावी करण्यास सुरुवात केली, घरात गुंडगिरी केल्यावर आपण दिसू वगैरे…हा माझ्या मनात झालेला चुकीचा गैरसमज होता. पण, मी खरंच अशी नाहीये.”

दरम्यान, गेल्या आठवड्यात जान्हवी घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाली होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून ती सेफ असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अभिनेत्री येत्या नवव्या आठवड्यात कसा खेळ खेळणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.