Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी घरात ‘महाचक्रव्युह’ टास्क पार पडला आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना विजेत्या स्पर्धकाला किती रुपये मिळणार याची आकडेवारी सांगितली. पण, तेवढी रक्कम मिळवण्यासाठी सगळ्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) यंदाच्या सीझनच्या विजेत्याला २५ लाख रुपये मिळतील अशी घोषणा केली. मात्र, तेवढी रक्कम संबंधित सदस्याला टास्क पूर्ण केल्यावरच मिळणार आहे. यासाठी ‘बिग बॉस’ने घरात ४ जोड्या बनवल्या आहेत. या चार जोड्यांना प्रत्येकी ६ लाख २५ हजार एवढी रक्कम टास्कमधून जिंकून आणायची आहे. जर एखादी जोडी ६.२५ लाख ही रक्कम जिंकण्यात अयशस्वी ठरली तर, तेवढे पैसे बक्षिसाच्या रकमेतून वजा केले जाणार आहेत.

हेही वाचा : आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”

टास्क खेळण्यासाठी जान्हवी व धनंजय ही पहिली जोडी गेली. या दोघांनी १ लाख ३० हजार कमावले. यानंतर गेलेल्या अभिजीत-अंकिताने ३ लाख १५ हजार कमावले. तर, टास्कमध्ये सहभागी झालेल्या तिसऱ्या जोडीने म्हणजेच निक्की-वर्षा यांनी २ लाख ८५ हजार कमावले. याचा अर्थ या तीन जोड्यांनी मिळून एकूण ७ लाख ३० हजार रुपये कमावले. आता उद्या पॅडी आणि सूरज यांची जोडी टास्क खेळायला जाईल. यानंतर विजेत्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून किती लाख मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

निक्की का रडली?

निक्कीचा टास्क संपला तेव्हा ४३ सेकंद बाकी राहिले होते. त्यामुळे हा टास्क संपल्यावर ती प्रचंड नाराज झाली होती. अजून झेंडे गोळा करून आणखी रक्कम जिंकता आली असती, असे अनेक विचार तिच्या डोक्यात सुरू होते. याशिवाय या टास्कमध्ये तिच्या हातून एक मोठी चूक घडली. महाचक्रव्युहात ५० हजार रक्कम लिहिलेली चांदीची वीट एका भांड्यावर ठेवण्यात आली होती. निक्कीने त्या चांदीच्या विटेऐवजी रिकामी भांडं उचललं आणि मोठा गोंधळ झाला. वर्षा यांनी व्यवस्थित मार्गदर्शन न केल्यामुळे त्यांच्या टीमला ५० हजारांचा फटका बसला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 च्या विजेत्याला मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, पण…; यात आहे एक मोठा ट्विस्ट, पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

‘बिग बॉस’ने घडलेली चूक सांगताच निक्की मोठमोठ्याने रडत, “खरंच आपण काय खेळलो याची मला लाज वाटतेय…मी कोणालाही दोष देत नाहीये पण, खरंच चांगला खेळता आलं असतं” असं म्हणत होती. यानंतर महाचक्रव्युहात पॅडी-सूरज जाणार आहेत. दरम्यान, या टास्कसंदर्भात निक्कीने कितीही त्रागा केला तरीही, घरातल्या अन्य सदस्यांनी वर्षा उसगांवकर टाइम लिमीटनुसार अगदी योग्यप्रकारे खेळल्या असं मत मांडलं आहे. मात्र, निक्कीला यातलं काहीच पटलेलं नाही आहे, तिने सूरजला जोर लावून खेळ आणि जास्तीत जास्त रक्कम कमावून आण असा सल्ला दिला आहे.