Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात सूरज चव्हाण बाजी मारणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर रितेश देशमुखने टॉप-२ स्पर्धकांना घराचे दिवे बंद करून मंचावर आमंत्रित केलं आणि सूरजचं नाव विजेता म्हणून घोषित केलं. यानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र, असंख्य प्रेक्षकांना अभिजीत सावंत यंदाच्या पर्वाचा उपविजेता ठरल्याचं वाईट वाटलं आहे.

अभिजीत सावंत गेममध्ये पहिल्या दिवसापासून खूप शांतपणे खेळला. त्याने कधीही कोणाशी वाद घातला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा संयम शेवटपर्यंत सुटला नाही. त्याच्या या वागण्याचं रितेशने देखील भाऊच्या धक्क्यावर कौतुक केलं होतं. अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’प्रमाणे पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकावी अशी त्याच्याही फॅन्सची इच्छा होती. मात्र, सूरजच्या भन्नाट लोकप्रियतेपुढे ते शक्य झालं नाही. आता संपूर्ण कलाविश्वातून सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. पण, काही कलाकारांच्या या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा : “झापुक झुपूक पॅटर्नमध्ये…”, विजयी झाल्यावर सूरज चव्हाणची पहिली प्रतिक्रिया! १४.६ लाखांचं काय करणार? म्हणाला…

पुष्कर जोगची पोस्ट

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पहिल्या पर्वाचा उपविजेता आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. अभिनेता म्हणतो, “सूरजसाठी मी आनंदी आहेच…पण, नेहमी आश्चर्य वाटतं की, शांत, सज्जतेने वागणारे स्पर्धक शेवटी उपविजेते ठरतात. थोडं रिलेटेबल आहे पण, शेवटी एवढं म्हणेन अभिजीत सावंत ‘हार्ड लक”

हेही वाचा : लहानपणी आई-वडिलांचं निधन, सख्ख्या ५ बहिणी अन्…; Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : पुष्कर जोगची पोस्ट

पुष्कर देखील त्याच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून संयम ढळू न देता खेळला होता आणि शेवटी तो उपविजेता ठरला. आता तसंच काहीसं अभिजीतच्या बाबतीत झालं असं पुष्करने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून सुचित केलं आहे.