Bigg Boss हा शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी होतात. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहायला मिळतात. आता ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजत असून, या सीझनबद्दल आणि घरातील सदस्यांबद्दल मोठी चर्चा होताना दिसत आहे. आता ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने एका मुलाखतीदरम्यान जान्हवी किल्लेकरबाबत वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली मेघा धाडे?

‘एंडेमोल शाइन इंडिया’ला मेघा धाडेने नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी तिला जान्हवी किल्लेकरबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना मेघा म्हणाली, “जान्हवी माझीच काय; पण कोणाचीच लाडकी होऊ शकत नाही. फार फार तर ती तिच्या घरच्यांची लाडकी होऊ शकते. त्याच्या बाहेर ती कुणाचीही लाडकी होऊ शकत नाही. इतकं की, तिनं या खेळात नुकसान केलेलं आहे. नंतर तिनं माफी मागून नुकसानभरपाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याचा काय उपयोग आहे? हे तिचं तिलाही नंतर कळतंय, नुकसान झालेलं आहे. तू एखाद्याला चाकूनं मारून टाकलं. तो मेला. दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर वाटलं की, असं आपण वागायला नव्हतं पाहिजे. उगाच मारलं, तर त्या वाटण्यानं मेलेला माणूस जिवंत होणार आहे का?”

हेही वाचा: प्रियांका चोप्राच्या भावाचा पार पडला साखरपुडा! पाया पडून घेतले बहिणीचे आशीर्वाद, फोटो आले समोर

“एखाद्याला वाईट बोलून तिनं त्या व्यक्तीची इज्जत घालवली, असं तिला वाटतं; पण नाही, उलट तुझीच इज्जत तू घालवतेयस. तुझंच नाव खराब होतंय. समोरच्याचं काहीही बिघडत नाही. उलट तू समोरच्याला सहानुभूती मिळवून देतेस आणि तू वाईट ठरतेस”, असे जान्हवी किल्लेकरबाबतचे मत मेघा धाडेने मांडले आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये मेघा धाडेने संपूर्ण पर्व गाजवले होते. आपल्या वागण्या-बोलण्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. आता तिने जान्हवी किल्लेकरबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

दरम्यान, आता बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची घरातील सदस्यांमुळे मोठी चर्चा होताना दिसत आहे. या पर्वात सदस्यांमध्ये मोठी भांडणे होताना पाहायला मिळत आहेत. आता या आठवड्यात घरात कोणता नवीन कल्ला होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.