Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू झाला आहे. पण सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच कारण आहे सोमवारी ‘बिग बॉस’ने केलेली घोषणा. ‘बिग बॉस मराठी’चं हे पाचवं पर्व १०० दिवसांच नसून ७० दिवसांचं असणार आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. घरात आता आठ सदस्य राहिले आहेत. गेल्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर गेले. वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस मराठी’मध्ये एन्ट्री केलेला संग्राम चौगुले वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर झाला. त्यानंतर रविवारी अरबाज पटेलचं एलिमिनेशन झालं. ही एलिमिनेशन प्रक्रिया फारच रंजक होती.

एलिमिनेशनची प्रक्रिया ‘अशी’ पार पडली…

रविवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि जान्हवी यांना अ‍ॅक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावलं. या एरियामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्याची बॅग ठेवण्यात आली होती. या बॅगमध्ये संबंधित सदस्य सेफ आहे की डेंजर झोनमध्ये याच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. वर्षा, सूरज आणि जान्हवी यांच्या बॅगमध्ये सेफची पाटी होती. त्यामुळे हे तिघजण घराबाहेर जाण्यापासून वाचले. पण अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये गेले. त्यानंतर ‘बिग बॉस’ने अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. यावेळी निक्कीला धक्काच बसला. ती ढसाढसा रडू लागली. एवढंच नाहीतर अरबाज पटेल घराबाहेर जात असताना त्याचे पाय पकडून निक्की रडत होती. अरबाज ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यापासून खूप चर्चेत आहे.

हेही वाचा – “मी ही सूरजसारखा तळागाळातून आलोय…”, अरबाज पटेलचं वक्तव्य, म्हणाला, “त्याच्याकडे गेम नाहीये, पण…”

नुकताच अरबाज पटेलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने पहिल्यांदाच स्वतःच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये, अरबाज पत्रकार मंडळींना म्हणतोय की, ‘बिग बॉस मराठी’चा प्रवास खूप भारी होता. एवढ्या लवकर प्रवास संपेल असं वाटतं नव्हतं. ठीक आहे. पुढे अजून बरंच काही करायचं आहे.

त्यानंतर अरबाजला विचारलं, “तुला अनफेयर एलिमिनेशन झालं, असं वाटतं का?” यावर अरबाज पटेल म्हणाला, “सर्व लोक हेच म्हणत आहेत. अनफेयर एविक्शन झालं आहे.” तेव्हा एका पत्रकाराने विचारलं, “तुला काय वाटतं?” अरबाज म्हणाला की, मला पण हेच वाटतंय. कारण सर्वांना माहितीये मी कुठेही चुकलो नाहीये. जर चूक झाली असती आणि बाहेर आलो असतो, तर ठीक आहे. पण काही चुकीच नसता बाहेर आल्यामुळे अनफेयर वाटतं.

हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

पुढे त्याला मित्र अदनानच्या लग्नाविषयी विचारलं. अदनानच्या लग्नासाठी काय शुभेच्छा देशील? तेव्हा अरबाज हसत म्हणाला, “त्याच्याच लग्नासाठी मी बाहेर आलो आहे.” त्यानंतर विचारलं की, तुझं लग्न कधी आहे? त्यावर अरबाज पटेल लाजत म्हणाला, “अजून वेळ आहे. आता तर प्रवास सुरू झाला आहे.”

दरम्यान, या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरात राहिलेल्या आठही सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठ सदस्यांपैकी कोणत्या सदस्याचा घराबाहेर जाण्यापासून बचाव होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.