Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून बाहेर आल्यापासून अरबाज पटेल खूप चर्चेत आला आहे. विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी तो संवाद साधताना दिसत आहे. याच वेळी अरबाजने सूरज चव्हाणविषयी काही वक्तव्य केली आहेत. तो नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना अरबाज पटेलला विचारलं की, तुझ्यामते टॉप-३ सदस्य कोण आहेत? त्यावर अरबाज म्हणाला, “टॉप-३ नाही टॉप-२ आहेत, निक्की- सूरज. सूरजबद्दल बाहेर खूप प्रेम दिसतंय. सूरजच्या पाठिशी बाहेर खूप लोक आहेत. त्याच्या गेम नाहीये पण लोक त्याला खूप प्रेम देत आहेत. सूरजबद्दल लोकांमध्ये एक सहानुभूती निर्माण झाली आहे. एक गरीब मुलगा आहे. तर त्याला संधी पाहिजे. तो पैसा दिला पाहिजे. कारण मराठी ‘बिग बॉस’चे फक्त पाच सीझन झाले आहेत, जास्त सीझन झाले असते तर तिकडे लोकांनी गेम पाहिला असता. गेम काय आहे? काय नाही? पण इकडे आता लोक हे पाहणार की सूरजसाठी ते काय करू शकतात. ते आता फक्त सूरजला मत देऊ शकतात. तर ते करू राहिले आहेत. ते सूरजसाठी चांगलं आहे. पण मी स्पष्ट सांगेन सूरजकडे गेम नाहीये. लोकांना ते दिसतंय. पण तो फक्त साधा मुलगा आहे. त्याला सांगावा लागत असं-असं करायचं आहे.”

हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

तसंच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना अरबाजला विचारलं, “तुझ्या आई-वडिलांचं म्हणणं होतं की तू गेम चांगला खेळतोस. पण तू निक्कीपासून लांब राहिलं पाहिजे. तर तेव्हा तुझं आई-वडिलांबरोबर बोलणं झालं असतं तर अरबाज निक्कीपासून लांब राहिला असता?” या प्रश्नाचं उत्तर देत अरबाज पटेल म्हणाला, “नाही. तेव्हा जर माझं बोलणं झालं असतं तर त्यांना मी समजवलं असतं. घरात माझ्याबरोबर कोणी नाहीये. बाहेर माझे आई-वडील आहेत. जे मला समजून घेतात. माझी काळजी घेतात. माझ्या भावना समजून घेतात किंवा माझ्या डोक्यावर हात ठेवतात. तिकडे कोणी डोक्यावर हात ठेवणारा नव्हता. तिकडे कोणी मिठी मारणारा नव्हता आणि त्या घरामध्ये राहणं लोकांना फार सोप वाटतंय. पण तिकडे राहताना किती गोष्टींचा सामना करावा लागतो, हे आम्हाला माहितीये. तर तिथे तुम्हाला ती गोष्ट पाहिजे असते, कोणी तरी तुमच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे, पाठीवर हात ठेवला पाहिजे, तुमची नजर काढली पाहिजे. तुम्ही व्हिडीओ बघाल जेव्हा जेव्हा मी कॅप्टन झालोय तेव्हा निक्कीला असं वाटलं, अरबाजने काहीतरी चांगलं केलंय. त्यामुळे तिने माझी नजर काढली. तसं माझ्याबरोबर तिचं वेगळं नात होतं, तर मी तिच्यापासून कसं लांबणार नाही?”

पुढे अरबाज पटेल म्हणाला, “जेव्हा मी आता माझ्या घरच्या लोकांना सांगितलं, तेव्हा पण त्यांना समजलं. माझ्या घरच्या लोकांनी कधी असं बघितलं नव्हतं ना. कोणीतरी टीव्हीवर आलंय वगैरे. माझं पण सूरजसारखचं आयुष्य आहे. सूरज जसा तळागळातून आला आहे तसा मी आलो आहे. पण मी सांगितलं नाही कारण लोक मला बघून स्वीकारणार नाही. माझं व्यक्तिमत्त्व बघून लोकांना वाटणारच नाही मी तळागाळातून आलो आहे. कारण मी स्वतःला तसं बनवलं आहे. जर मी असं दाखवलं असतं तर वेगळी गोष्ट असली असती. माझ्या घरचे लोक तसे नाहीयेत.”

हेही वाचा – Video: निक्की विरुद्ध घर, कधी कामावरून तर कधी अरबाज घरातून जाताना झालेल्या ड्रामावरून सदस्य करतायत चर्चा, म्हणाले…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरात राहिलेल्या आठही सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठ सदस्यांपैकी कोणत्या सदस्याचा घराबाहेर जाण्यापासून बचाव होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 arbaz patel talk about suraj chavan pps