Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. परंतु, ‘बिग बॉस’ने पहिल्याच दिवशी संपूर्ण घरातील पाणी बंद केल्यामुळे स्पर्धकांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा बीबी करन्सीवर घरातल्या सगळ्या सुख-सुविधांचं गणित ठरणार आहे. घरातल्या ‘डिसिजन मेकर’ या पहिल्याच टास्कमध्ये इरिना, धनंजय आणि सुरजने बेड खरेदी न केल्याने सर्व सदस्यांना स्लिपिंग बॅग घेऊन खाली जमिनीवर झोपावं लागलं असं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये पाहायला मिळालं.

‘बिग बॉस’च्या घरात केवळ जान्हवी ( पॉवर कार्ड असल्याने ) एकटीच बेडवर झोपली होती. इतर सगळ्या सदस्यांना ‘बिग बॉस’ने शिक्षा म्हणून जमिनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तसेच बेडचा अजिबात वापर करू नये असे सक्त आदेश देखील दिले होते. परंतु, घरातील काही सदस्यांकडून या नियमाचं उल्लंघन होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’ घोषणा करत सांगतात, “मी बेड वापरण्याची परवानगी देणार होतो…पण, घरातील काही सदस्यांनी नियमभंग केल्यामुळे आता इथून पुढे आठवडाभर तुम्हाला सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल” याशिवाय स्पर्धकांची बीबी करन्सी देखील जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट! सदस्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला, पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi च्या घरात जोरदार भांडण

‘बिग बॉस’चा निर्णय ऐकल्यावर निक्की प्रचंड संतापते कारण, वर्षा उसगांवकरांना बेडवर झोपून नियमांचा भंग करताना तिने पाहिलेलं असतं. तुमच्यामुळे आम्हाला ही शिक्षा मिळाली असं बोलत ती पार त्यांची अक्कल काढते. यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण होतं. दोघीही एकमेकींशी प्रचंड भांडतात…शेवटी धनंजय म्हणतो, “अभिजीत दादा अन् वर्षा ताई बेडवर बसल्या होत्या” यावर वर्षा म्हणतात, “हो तेच… मी एकटीने नियम मोडलेला नाही” यानंतर पुन्हा निक्की – वर्षामध्ये भांडण सुरू होतं. घरातले मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात मात्र, निक्की “तुम्ही सगळे काहीतरी बोला…मी एकटीच का स्टॅण्ड घेऊ?” असा उलट प्रश्न त्यांना करते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती”, निक्की वर्षा उसगांवकरांवर भडकली अन्…, पाहा प्रोमो

सर्वांसमोर वर्षा यांच्याशी वाद झाल्यावर निक्की बेडरुममध्ये निघून जाते. याठिकाणी छोटा पुढारी या स्पर्धकासमोर ती आपल्या भावना व्यक्त करत भावुक होते. तिला अश्रू अनावर होतात. तर इतक्यात अंकिता तिला “तू वर्षा मॅमला अरे तुरे बोलायला नको होतं” असं सांगते. यावर निक्की वर्षा यांना उद्देशून म्हणते, “मॅम तुम्हाला मी अरे तुरे बोलले तर त्याच्यासाठी मी माफी मागते. अरे तुरे बोलून मला तुमचा अनादर करायचा नव्हता. इतर कोणत्याही गोष्टीसाठी मी सॉरी म्हणणार नाही.”

Bigg Boss Marathi फोटो सौजन्य : जिओ सिनेमा

घरात झालेल्या या वादानंतर वर्षा उसगांवकर एकट्या सोफ्यावर बसून भावुक झाल्याचं आजच्या भागात पाहायला मिळालं. सध्या सर्वत्र वर्षा व निक्कीमध्ये झालेल्या या वादाची चर्चा रंगली आहे.