Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या काही दिवसांपासून अरबाज-निक्कीच्या प्रेमाचे वारे वाहत होते. परंतु, आता पुढील आठवडाभर वर्षा उसगांवकरांच्या कॅप्टन्सीचे वारे घरात वाहणार आहेत. यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा बहुमान वर्षा उसगांवकर यांना मिळाला आहे. आता संपूर्ण आठवडाभर घराचा कार्यभार त्या सांभाळतील. याशिवाय येत्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्या सेफ असतील.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टनपदाचा पहिला बहुमान अंकिताला मिळाला होता. यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला. मात्र, अरबाजच्या कॅप्टन्सीदरम्यान बीबी करन्सी एकाही टीमने मिळवली नसल्याने त्याला कॅप्टन्सीवर पाणी सोडावं लागलं. परिणामी अरबाजने आपली कॅप्टन्सी निक्कीला दिली. निक्कीचा कॅप्टनपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर घरात नवा कॅप्टन निवडण्यासाठी ‘मुंज्या’ टास्क खेळवण्यात आला. यात कॅप्टनपदासाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांना मुंज्यासमोर आपण कसे चांगले कॅप्टन होऊ शकतो तसेच इतर सदस्यांपेक्षा आपण कसे वरचढ आहोत यावर चर्चा करायची होती. या टास्कमध्ये शेवटी वर्षा, सूरज, अंकिता, वैभव आणि जान्हवी असे पाच जण राहिले होते. अंकिताने वर्षा मॅम कॅप्टन व्हायला हव्यात या डीलवर या गेममधून माघार होण्याचा निर्णय घेतला. मात्र, वैभव व जान्हवी दोघेही कॅप्टनपदासाठी आग्रही होते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तोच माज, बॉडी लँग्वेज तशीच…”, जान्हवीला जेलमध्ये पाठवून काय फरक पडला? सुरेखा कुडची यांचा सवाल, म्हणाल्या…

वर्षा उसगांवकरांनी जान्हवी-वैभवसमोर स्वत:चे मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडले आणि यामुळे जान्हवी चांगलीच बुचकळ्यात पडली. वर्षा यांनी वैभव-जान्हवीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये त्या कशा चांगल्या खेळल्या हे सर्वांसमोर स्पष्टपणे मांडलं. एवढं करूनही जान्हवी-वैभव ऐकत नव्हते. त्यामुळे ‘बिग बॉस’ने एक मोठा निर्णय घेतला. ‘बिग बॉस’ची घोषणा ऐकताच घरातले सदस्य जल्लोष करून नाचू लागले. त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे आणि ‘बिग बॉस’च्या त्या एका निर्णयामुळे बाजी कशी पालटली गेली जाणून घ्या…

वर्षा उसगांवकर ‘अशा’ झाल्या कॅप्टन

‘बिग बॉस’ने कॅप्टनपदासाठी कोणाची निवड करायची हे ठरवण्याचा विशेष अधिकार ‘पाताळ लोक’ टास्क गमावलेल्या ‘ए’ टीमला दिला. निक्की, अरबाज, पॅडी, घन:श्याम आणि अभिजीत या पाच सदस्यांना बहुमताने जान्हवी, वैभव आणि वर्षा यांच्यापैकी एकाची कॅप्टनपदासाठी निवड करायची होती. या पाच जणांनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्या आनंदाने कॅप्टनपदासाठी वर्षा उसगांवकरांचं नाव सुचवलं. अगदी अरबाजने देखील दोन्ही मित्रांना बाजूला करून वर्षा यांच्या नावाला सहमती दर्शवली. वर्षा यांनी कॅप्टन पद स्वीकारल्यावर “हमारा नेता कैसा हो, वर्षा ताई जैसा हो…” अशा घोषणा घरातील सर्व सदस्यांनी दिल्या. वर्षा टास्क संपल्यावर बाहेर येताच त्यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “टीम B ला मस्त मूर्ख बनवलं…”, निक्की-अरबाज पुन्हा आले एकत्र! ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; ‘असा’ आहे गेमप्लॅन

Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यावर घरात ( Bigg Boss Marathi ) काय बदल होणार आणि सदस्यांमध्ये ड्युट्यांची विभागणी कशाप्रकारे केली जाईल यावर चर्चा करण्यात आली आहे. आता वर्षा यांच्या कॅप्टन्सीमध्ये घरात काय-काय धमाल पाहायला मिळेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.