Bigg Boss Marathi Varsha Usgaonker : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मैत्रीची समीकरणं दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज पटेलने बाजी मारत घरात दुसऱ्यांदा कॅप्टनपद मिळवलं आहे. यावेळी वर्षा उसगांवकर आणि अरबाज यांच्यात अंतिम फेरी रंगली होती. मात्र, या कॅप्टन्सी कार्याच्या आधीच निक्की आणि वर्षा यांच्यात अरबाज कॅप्टन होईल असं डील झालेलं होतं. घरात गेल्या ५३ दिवसांपासून ‘टीम बी’कडून खेळणाऱ्या वर्षा उसगांवकरांनी अचानक त्यांचा गेम बदलल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर हळुहळू त्यांच्या ‘बी टीम’च्या विरोधात जात होत्या. एका नॉमिनेशन टास्कमध्ये त्यांनी धनंजयला नॉमिनेट केलं होतं. एवढंच नव्हे तर, दोन दिवसांआधीच त्यांचं आणि डीपीचं घरात भांडण देखील झालं होतं. या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी वर्षा, धनंजय, सूरज आणि अरबाज असे चार दावेदार ठरले होते. जेव्हा टास्कचं परिपत्रक वाचण्यात आलं त्यावेळी वर्षा उसगांवकर, निक्की-अरबाजबरोबर जाऊन बसल्या. ही गोष्टी अंकिताने लगेच हेरली आणि याबद्दल तिच्या ग्रुपला सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अरबाज पटेल दुसऱ्यांदा झाला कॅप्टन! पहिल्याच फेरीत निक्कीने बाजी पालटली अन्…; नेमकं काय घडलं? वाचा

अभिजीतने सुद्धा यापूर्वीच्या चर्चेत वर्षा ताई खूप डोकं लावून खेळत असल्याचं नमूद केलं होतं. ‘टीम बी’ने आधीच बांधलेल्या अंदाजानुसार वर्षा उसगांवकर कॅप्टन्सी कार्याआधी निक्की-अरबाजशी चर्चा करण्यासाठी गेल्या. निक्की अरबाजला कॅप्टन करायचं या निर्णयावर ठाम होती. अगदी जान्हवी सुद्धा आज त्याला पाठिंबा देत होती. त्यामुळे या चौघांनी रणनीती आखत धनंजयला या कार्यातून लवकरात लवकर बाद करायचं ठरवलं. पहिल्या फेरीत सूरज बाहेर झाला, दुसऱ्या फेरीत धनंजयने एक्झिट घेतली. तर, अंतिम फेरी निक्कीच्या प्लॅनप्रमाणे वर्षा-अरबाजमध्ये रंगली. शेवटी अरबाजने यात बाजी मारली.

अंतिम फेरीत वर्षा उसगांवकरांनी ‘टीम बी’च्या सदस्यांना त्यांना मदत म्हणून एक ग्लास पाणी प्या ( टास्क ) अशी विनंती केली होती. मात्र, पंढरीनाथने त्यांना थेट जाब विचारला. “तुम्ही पाणी प्यायला आम्हाला सांगताय पण, तुमची strategy त्यांच्याबरोबर आहे असं कसं चालेल?” असा प्रश्न विचारत पॅडीने ‘बी टीम’चे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. वर्षा काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. अंकिता, अभिजीत, पॅडी सर्वांचे मुद्दे त्यांनी खोडून काढले. मात्र, पहिले आठ आठवडे आम्ही तुम्हाला किती पाठिंबा दिला हे संपूर्ण ‘बी टीम’ने यावेळी अधोरेखित केलं. यावर, शेवटी वर्षा यांनी निक्की-अरबाजच्या टीमने सुद्धा मला चांगल्य़ाप्रकारे टास्क समजावून सांगितला असं प्रतिउत्तर त्यांना दिलं.

हेही वाचा : तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

५३ दिवसांनी गेम बदलल्यामुळे वर्षा यांच्याबद्दल नाराजी

वर्षा यांनी आठव्या आठवड्यात म्हणजेच जवळपास ५३ दिवसांनी आपला गेम बदलल्यामुळे नेटकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “स्वत:च्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारणे”, “ज्या निक्कीने अपमान केला त्यांना सपोर्ट करत आहेत”, “टीम बीच्या पाठीत खंजीर खुपसला”, “वर्षा मॅम चुकीचं खेळत आहेत” अशा प्रतिक्रिया ‘कलर्स मराठी’च्या पोस्टवर नेटकऱ्यांनी आजचा ( २० सप्टेंबर २०२४ ) भाग पाहून दिल्या आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांवर नेटकरी नाराज

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “मला ‘अरबाज-२’, ‘बैल’ अशी नावं पाडली, पण आता…”, घराबाहेर आल्यावर वैभवचा निर्धार; म्हणाला, “ट्रॉफी बारामतीत…”

दरम्यान, या आठवड्यात वर्षा उसगांवकर नॉमिनेट सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास संपणार की त्या नवव्या आठवड्यात एन्ट्री घेणार हे लवकरच भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.