Bigg Boss Marathi Winner Prize Money : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सीझनमध्ये एकूण १६ जणांनी प्रवेश घेतला होता. यापैकी आता फक्त घरात ८ सदस्य उरले असून खेळ अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरवर्षी ‘बिग बॉस’च्या घरात शंभर दिवसांचा खेळ झाल्यावर विजेता स्पर्धक कोण होणार हे मतांच्या आधारे ठरवलं जातं. मात्र, यंदाचा सीझन फक्त ७० दिवसांचा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर १० व्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता कोण आहे हे स्पष्ट होईल.

खेळाच्या ( Bigg Boss Marathi ) अंतिम टप्प्यात नुकताच घरात महाचक्रव्यूह टास्क घेण्यात आला. यामध्ये स्पर्धकांना २५ लाख जिंकण्याची संधी होती. ‘बिग बॉस’कडून एकूण चार जोड्या बनवण्यात आल्या होत्या. या चारही जोड्यांना प्रत्येकी ६ लाख २५ हजार रुपये जिंकायचे होते. मात्र, या टास्कमध्ये कोणालाही अपेक्षित रक्कम जिंकता आली नाही. परिणामी, २५ लाखांमधले तब्बल १६ लाख ४० हजार एवढी रक्कम घरातल्या सदस्यांनी गमावली आहे. कोणत्या जोड्यांनी किती रक्कम कमावली जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : लेकीसाठी बाबा कोकणातून पहिल्यांदाच आले मुंबईत! अंकिताला अश्रू अनावर, ‘बिग बॉस’ला म्हणाली…; पाहा भावुक प्रोमो

विजेत्या स्पर्धकाला मिळणार फक्त…

  • जान्हवी व धनंजय – १ लाख ३० हजार
  • अंकिता व अभिजीत – ३ लाख १५ हजार
  • निक्की व वर्षा – २ लाख ८५ हजार
  • सूरज व पंढरीनाथ – १ लाख ३० हजार
  • एकूण – ८ लाख ६० हजार

“महाचक्रव्यूह टास्कमध्ये घरातील सदस्यांनी २५ पैकी केवळ ८ लाख ६० हजार जिंकल्यामुळे आता पाचव्या सीझनचा विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे… ८ लाख ६० हजार” अशी घोषणा ‘बिग बॉस’कडून घरात करण्यात आली. तर, चारही जोड्यांनी मिळून १६ लाख ४० हजार या टास्कमध्ये गमावले आहेत. एवढी रक्कम टास्कमध्ये गमावल्याने घरातील सगळेच सदस्य नाराज झाले होते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- वडिलांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला! धनंजयच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; आई अन् पत्नीला पाहिल्यावर केलं असं काही…; पाहा व्हिडीओ

आता ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) घोषणा केल्याप्रमाणे प्रत्यक्षात देखील विजेत्या स्पर्धकाला ८ लाख ६० हजार एवढीच रक्कम बक्षीस म्हणून मिळणार की, ‘बिग बॉस’कडून सदस्यांना आणखी संधी देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे महाअंतिम सोहळ्यात कोण बाजी मारणार आणि पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.