अभिनेता शशांक केतकर जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. तितक्याच तो त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. काल, १३ जूनला शशांकने मुंबईतील फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग पाहून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त करत मुंबई महानगरपालिकडे तक्रार दाखल केली होती. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि मग त्याच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने एका रात्रीत कारवाई केली. मुंबई फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग असलेली जागा स्वच्छ केली. याबाबत शशांकने मुंबई महानगरपालिकेने आभार मानले आहे.

शशांक केतकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वच्छ केलेल्या जागेचा फोटो शेअर करत लिहिलं, “मुंबई महानगरपालिकेने तातडीनं कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. मुंबई महापालिके इतकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे.”

हेही वाचा – २७ वर्षांनंतर येतोय ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस; सनी देओलसह आयुष्मान खुराना झळकणार, प्रदर्शनाची तारीख ठरली!

त्यानंतर शशांकने व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओत तो म्हणाला, “हाय, हॅलो, नमस्कार. काल फिल्मसिटीच्या गेटजवळ बराच कचरा दिसला. त्याचा मी व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. सगळ्यांनी उचलून धरली. माझी तक्रार थेट मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचली. मुंबई महानगरपालिकेने लगेच त्यावर कारवाई केली. एका रात्रीत तिथनं सर्व कचरा हटवला आणि त्याचा फोटो काढून त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर टाकलेला आहे. त्यात मला सुद्धा त्यांनी टॅग केलं आहे. खूप बरं वाटतं जेव्हा आपण एखादी तक्रार करतो. आपला आवाज मुंबई महानगरपालिका ऐकतंय. तर तुमच्याही भागामध्ये असा कुठला कचरा असेल तर जरूर मुंबई महानगरपालिकेला टॅग करा आणि मी फक्त आता मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय कारण हे सगळं मुंबईत घडलं. महाराष्ट्रात, देशात कुठेही तुमच्या भागात जर असं काही घडतं असेल तुम्ही तुमचा आवाज उठवा तुम्ही तो तुमच्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवा. ते कारवाई करतात. ते सक्रिय असू शकतात. पण आता या कारवाईची खरंच गरज आहे.”

हेही वाचा – “हा हिरो प्रत्यक्षात येऊन माझा तारणहार बनू शकेल का?” विजू मानेंची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाले, “तो दिवस लवकर येवो”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Shashank-Ketkar-3-98.mp4

पुढे शशांक म्हणाला, “त्या पोस्टच्या खाली खूप छान प्रतिक्रिया होती. आता आमच्या भागातला कचरा स्वच्छ करायचा आहे हे सांगण्यासाठी बहुतेक मला शशांक केतकरांना सांगावं लागेल. तर ते मुंबई महानगरपालिकेला सांगितलं. मी खरंच इतका काही मोठा नाहीये. पण हे असं माझ्या सांगण्याने होणार असेल तर मी ती सुद्धा जबाबदारी घ्यायला तयार आहे. मीच नाही तर हे प्रत्येकजण; ज्यांचा ज्यांचा आवाज ऐकला जाऊ शकतो अशा प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी उचला आणि ती महानगरपालिकेपर्यंत, राज्यसरकारपर्यंत, देशाच्या प्रमुख माणसांपर्यंत या सगळ्या तक्रारी पोहोचवा. कारण हे सगळं माणसाच्या जगण्याशी निगडीत आहे आणि हे राजकारणाच्या फार पलीकडे आहे. तर पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार. त्या परिसरात पुन्हा अशी घाण होणार नाही, याची काळजीही घ्या. फक्त तोच भाग नाही अख्खी मुंबई आपण स्वच्छ करूया. कारण वरवरच बांधकाम चांगलं असून उपयोग नाही. कोअरमध्ये, ग्रासरूट लेव्हलला स्वच्छता होणं, चांगला परिसर, चांगली शाळा मिळणं, चांगल्या सुखसोयी मिळणं हे गरजेचं आहे. जेव्हा ग्रासरूट लेव्हला बदल होतील. तेव्हा मुंबई खऱ्या अर्थाने बरी होईल.”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Shashank-Ketkar-2-15.mp4

हेही वाचा – “आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा!” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “इतरांसाठी जगणारा माणूस…”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Shashank-Ketkar-2.mp4

दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नाटक, मालिका, चित्रपटाच्या आणि वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उटवला आहे. मराठीसह हिंदीत आता तो खूप सक्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे लागोपाठ हिंदी प्रोजेक्ट केले आहेत. ‘तेलगी स्कॅम २००३’, ‘शोटाइम’नंतर ‘गुनाह’ हा त्याचा नवा वेब शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेब शोमध्ये शशांकसह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे.