काही मालिका कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्यापैकी एक कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘दुर्गा’ ही मालिका आहे. आता या मालिकेत नवीन वळण आले असून दुर्गा(Durga) आणि अभिषेकच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मालिकेत सगळीकडे आनंदाचे वातावरण असले तरीही दुर्गा अस्वस्थ आहे. आपली खरी ओळख अभिषेकला कळावी यासाठी दुर्गा त्याला व्हॉइस नोट पाठवते. अभिषेकला खरे सांगितल्यामुळे तिला मनावरचा भार हलका झाल्यासारखे वाटते. परंतु ती व्हॉइस नोट अभिषेकचा मोठा भाऊ ऐकतो आणि तो तिला रिप्लाय देतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात मोठे वळण येणार आहे, याची जाणीव दुर्गाला होते.

“लग्नासाठी दुर्गा खूप उत्साही आहे, मात्र…”

रूमानी खरे ‘दुर्गा’ मालिकेतील नव्या ट्रॅक विषयी म्हणाली, “लग्नासाठी दुर्गा खूप उत्साही आहे. मात्र सगळ्या गोष्टी फार लवकर घडल्या की यावर विचार करायला तिला वेळच मिळाला नाही. सर्वात आधी तिला समजले की, अभिषेक हा दादासाहेबांचा मुलगा आहे, हे सत्य स्वत:ला समजावून सांगणे कठीण होते. मात्र ही गोष्ट मान्य करत जेव्हा त्याच्यापासून लांब जाण्याचे ठरवले तेव्हा त्याचा अपघात झाला.”

“त्यानंतर दुर्गाला लक्षात आले की, आपण काहीही केले तरी अभिषेकपासून दूर जाऊ शकत नाही. दुर्गा आणि अभिषेक यांच्यात गोष्टी सुरळीत होताच आईसाहेबांनी घोषित केले आम्ही तुमचे लग्न लगेच लावून देतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात यायलाच तिला खूप वेळ लागला आहे. दुर्गा अभिषेकवर मनापासून प्रेम करते. तरीसुद्धा कुठेतरी हा विचार आहे की, तो दादासाहेबांचा मुलगा आहे. आपण लग्न करुन त्याच घरात जाणार आहोत, ज्या घराचा आपण नाश करण्याचे ठरवले आहे. लग्नाबरोबरच दुर्गाच्या डोक्यात आईचासुद्धा विचार आहे. आईला सांभाळणे ही तिची जबाबदारी आहे. लग्नाच्या या सोहळ्यात दुर्गाचे मामा मामी तिच्यावर रागावून तिला सोडून गेले आहेत. या सगळ्यात दुर्गाला लग्नाच्या अगोदर तिचे सत्य अभिषेकला सांगायचे आहे. दुर्गा अभिषेकला सत्य सांगेल का? आतापर्यंत दुर्गा ही फक्त सुडाचा विचार करत होती. आता दुर्गाला लग्नानंतर दादासाहेब, आईसाहेब यांचादेखील विचार करावा लागणार असून दुर्गा मालिकेत आता अजून कोणते ट्विस्ट येणार आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे”.

हेही वाचा: Atul Parchure : अतुल परचुरेंना पुलंचा आशीर्वाद कसा लाभला होता? पेटीवर वाजवून दाखवलेल्या ‘कृष्ण मुरारी’ गाण्याचा किस्सा काय?

आता दुर्गाच्या सत्याचा तिच्या आणि अभिषेकच्या नात्यावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्गा आणि अभिषेक यांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. पुढे काय घडणार, दुर्गाचे सत्य कसे उघड होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.