‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेने काही वर्षांत मालिकविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्टार प्लसवर प्रदर्शित होणारी ही मालिका लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेला मिळालेले यश पाहता, ‘लीप’नंतर दिग्दर्शकांनी नवीन चेहऱ्यांसहित ही मालिका सुरूच ठेवली होती. भाविका शर्मा, शक्ती अरोरा यांच्या कामालादेखील प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत होती. आता या मालिकेत परत ‘लीप’ आला असून, शक्ती अरोराला अचानक मालिका सोडावी लागली आहे. चाहते तो मालिकेत नसल्याने नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आता शक्ती अरोराने एका मुलाखतीदरम्यान याबाबत वक्तव्य केले आहे.

शक्ती अरोराने मालिकेतून त्याच्या अचानक झालेल्या एक्झिटबद्दल म्हटले आहे की, जे झालं ते अनपेक्षित होतं. मला किंवा इतर कोणालाच याबद्दल काहीच कल्पना नव्हती. विश्वचषक सुरू असताना मालिकेचा टीआरपी हा २.१ असायचा आणि असा टीआरपी असणे विनोद नाही. मालिका उत्तम पुढे चालत होती, प्रेक्षकांना आवडत होती. अशात कोणताच दिग्दर्शक मालिकेमध्ये ‘लीप’ आणण्याचा विचार करणार नाही. मात्र, आता चॅनेलकडून काय सूचना आल्या ते फक्त त्यांना माहीत आहे. पुढे तो म्हणतो की, मला बाहेरून, मीडियाकडून मी शोमध्ये नसल्याची माहिती मिळत होती. पण, जरी मला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता तरी मी माझ्या मनाची तयारी करायला सुरुवात केली. मी निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मी खूप काळापासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. पण गुम है किसी के प्यार में या मालिकेला आधी टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकाला येणे कधीही शक्य झाले नाही. २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यापासून ते २०२४ च्या जानेवारीपर्यंत, असे सलग तीन महिने आमचा शो टीआरपी मध्ये एक नंबरला होता. मी जेव्हा शो सोडला तेव्हादेखील आम्ही टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर होतो. हे माझ्यासाठी वर्ल्ड कप जिंकल्यासारखे होते.

हेही वाचा : Video: मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

मालिकेच्या शेवटच्या दिवसाबद्दल बोलताना शक्ती अरोराने म्हटले आहे की, शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या शॉटपर्यंत मी हा विचार करrत नव्हतो की, माझ्यासाठी हा शो संपत आहे. पण, जेव्हा तो क्षण जवळ आला तेव्हा ती पोकळी निर्माण झाली होती. नंतरचे ५ दिवस मी माझा थकवा घालविण्यासाठी फक्त आराम केला, असे अभिनेत्याने म्हटले आहे.

आता भविष्याबाबत शक्ती अरोराच्या काय योजना आहेत, असा प्रश्न विचारला असता, त्याने म्हटले, “ज्या ज्या वेळी मी एखाद्या शोमधून बाहेर पडत असतो, तेव्हा पुढच्या कामाचा विचार करतो; पण यावेळी मला असे काहीही करायचे नाही. माझ्या भविष्याबाबत आता देवाला ठरवू दे. देव मला काय द्यायचा प्रयत्न करतोय हे मला जाणून घ्यायचे आहे.”