Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते आणि हेमा शर्मा. १५ ऑक्टोबरला गुणरत्न सदावर्तेंना अचानक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हेमा शर्मा एलिमिनेट झाली. पण, गुणरत्न सदावर्तेंच्या अचानक जाण्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच आता गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पुन्हा जाण्यासाठी जगभरातून चाहते सतत फोन करत असल्याचा खुलासा त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.

नुकतीच गुणरत्न सदावर्तेंसह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी गुणरत्न सदावर्तेंना विचारलं की, ‘बिग बॉस १८’मधून बाहेर काढण्यामागचं नेमकं कारण काय होतं? यावर सदावर्ते म्हणाले की, एका आठवड्याचा करार झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील म्हणाल्या, “मुळात यांना ( गुणरत्न सदावर्ते ) एविक्ट केलं नाही. करार होता. तसंच महत्त्वाच्या केसेस होत्या. त्यासाठी त्यांना जी तारीख दिली त्या तारखेला बाहेर यायचं होतं. त्यांना सन्मानपूर्वक बाहेर पाठवलं.”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंचा ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यामागचा होता ‘हा’ हेतू; म्हणाले, “कलाकारांची राजकीय लफडी…”

पुढे जयश्री पाटील म्हणाल्या, “एवढंच नाही त्यांना पुन्हा ‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी रोज फोन चालू आहेत. तुम्ही या. मी तर ऐकलंय टीआरपी कमी झालाय. तसंच फक्त महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून फोन येतायत. जे ‘बिग बॉस’चे फॉलोवर्स आहेत ते म्हणतात, आता आम्ही शो पाहणार नाहीये. आम्हाला तुम्हाला ( गुणरत्न सदावर्ते ) बघितल्याशिवाय करमत नाही. काहीजण रडतात. फॅन्स असे असतात हे मी पहिल्यांदाच पाहिलं.”

त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी पत्नीला टोकलं आणि म्हणाले, “फॅन्स नाही, लगते जिगर.” मग जयश्री पाटील म्हणाल्या की, हां, लगते जिगर. पहिले फक्त धमकीचे फोन यायचे आता लगते जिगरचे फोन येतात.

हेही वाचा – Bigg Boss 18: “अविनाशच्या अहंकारासाठी मी…”, रेशनसाठी करणवीर मेहराने घेतली ठाम भूमिका; नेटकरी कौतुक करत म्हणाले…

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस १८’चा तिसरा आठवडा सुरू असून या आठवड्यात अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे या पाच सदस्यांमधून कोण एलिमिनेट होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.