हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेत हार्दिकने राणादा तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही ही जोडी सर्वत्र लोकप्रिय आहे.

हार्दिक आणि अक्षयाने मालिका संपल्यावर वैयक्तिक आयुष्यात लग्नगाठ बांधली. या दोघांचा साखरपुडा मे २०२२ मध्ये पार पडला होता. साखरपुडा झाल्यावर जवळपास सहा महिन्यांनी म्हणजेच २ डिसेंबर २०२२ मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. लग्नानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी फिरायला जात असतात. एवढेच नव्हे तर ही जोडी देवदर्शनाला सुद्धा जाते. काही दिवसांपूर्वीच हार्दिक-अक्षया सप्तश्रृंगी गडावर देवदर्शनासाठी गेले होते. आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी अक्कलकोटला देवदर्शनासाठी पोहोचली आहे.

हेही वाचा : कोकणातल्या ‘मुंज्या’चं प्रेक्षकांना लागलं वेड, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, १०० कोटींचा आकडा केला पार

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घेतलं. राणादाने या मंदिर परिसरातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्याने या फोटोला “श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन” असं कॅप्शन दिलं आहे. यावेळी राणादा अन् पाठकबाईंनी पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. गुलाबी रंगाची साडी, गळ्यात साधं अन् सुंदर मंगळसूत्र असा अक्षयाचा लूक होता. तर, हार्दिकने सुद्धा बायकोला मॅचिंग असा कुर्ता परिधान केल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळालं. या दोघांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्नामुळे होतंय ट्रोलिंग, सोनाक्षी सिन्हाने उचललं मोठं पाऊल; विवाहाचे फोटो पोस्ट करताना तिने इन्स्टाग्रामवर…

दरम्यान, मालिकेच्या सेटवर चांगली मैत्री झाल्यावर खऱ्या आयुष्यात राणादाने पाठकबाईंच्या थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली होती. अक्षयाच्या आई-बाबांना त्याने अभिनेत्रीशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं होतं. यानंतर गुपचूप साखरपुडा उरकत या जोडप्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. पुढे, हार्दिक-अक्षयाने डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षक यांच्या जोडीला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.