अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरला हार्दिक-अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यात थाटात संपन्न झाला. सध्या त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची विशेष तयारी सुरु आहे. गेली अनेक वर्ष हार्दिकच्या घरी मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची पूजा केली जाते. यंदा दोघेही बाप्पाच्या आगमनासाठी कशी तयारी करणार? तसेच अक्षया आणि सासूबाईंचं नातं याबद्दल अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : Video : “संजनाने दहीहंडी फोडली पण…”, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
हार्दिक जोशी म्हणाला, “गेली अनेक वर्ष आमच्या घरी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. आपला प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा हा आमच्या घरचा नियम आहे. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्या संस्कृतीविषयी माहिती मिळेल. आपली संस्कृती जपण्यासाठी आपण छोटासा हातभार लावणं अत्यंत गरजेचं असतं.”
“तुला मोदक खायला आवडतात का? आणि मोदक बनवण्यासाठी तू आईला मदत करतोस का?” याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, “मोदक बनवायचा आणि माझा काहीच संबंध नाही…मला बनवता येत नाहीत. यापूर्वी मी किचनमध्ये गेल्यावर माझी आई मला ओरडायची, आता आईसारखी अक्षया सुद्धा मला ओरडते. किचनमध्ये लुडबूड केल्यावर अक्षया मला कायम ओरडत असते. दोघीही सारख्याच आहेत… तू आहे त्यापेक्षा काम वाढवून ठेवतोस असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांना आता माहिती आहे की, हार्दिक किचनमध्ये गेल्यावर फक्त चहा, ताक आणि लिंबू सरबत याच गोष्टी चांगल्या बनवू शकतो.”
दरम्यान, ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेमुळे हार्दिक-अक्षया प्रसिद्धीझोतात आले होते. या मालिकेत हार्दिकने राणादा, तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.