Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपलं आहे. रविवारी ( ६ ऑक्टोबर ) ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या महाअंतिम सोहळ्यापर्यंत अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे सहा सदस्य पोहोचले. या सहा सदस्यांपैकी सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे सध्या सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. तसंच दुसऱ्या बाजूला जान्हवीने शेवटच्या टप्प्यात खेळलेल्या खेळाचं देखील कौतुक होतं आहे.

जान्हवी किल्लेकर ही सहाव्या स्थानावरून ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाली. टॉप-६ स्पर्धकांना सात लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती. पण यावेळी कुठल्याही सदस्याने खेळ सोडणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर रक्कमेत दोन लाखांची वाढ केली. त्यामुळे रक्कम एकूण नऊ लाख झाली. यावेळी मात्र जान्हवीने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जान्हवीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण तिने खेळ सोडला नसता तर ती कमी मतांमुळे एलिमिनेट झाली असते. त्यामुळे तिला जे नऊ लाख मिळाले ते पण मिळाले नसते. म्हणून जान्हवीच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर टॉप-६ सदस्य माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहे. नुकताच जान्हवीने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला आणि एक विधान केलं. जान्हवी म्हणाली, “भाऊच्या धक्क्यावरून आणि प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिसादावरून मला वाटतं होतं मी टॉप-६मध्ये असेन.”

हेही वाचा – Video: “त्यांची तोंडं बंद केलीस…”, सूरज चव्हाणच्या विजयावर सुरेखा कुडची यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी सुरुवातीपासून…”

पुढे जान्हवी किल्लेकर म्हणाली, “जर ते चुकलं नसतं. यासाठी मी कोणाला दोष देत नाही. या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार मीच आहे. याला मी कोणालाच जबाबदार धरत नाही. जर तसं झालं नसतं तर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची विजेती मी असते. १०० टक्के मी असते. बाहेर बघणाऱ्या लोकांना खूप सोप वाटतं. तिथे आतमध्ये जाऊन राहणं, ते जगणं, त्या लोकांशी बॉन्डिंग करणं. शेवटी काय आहे ना बाहेरच्या जगातून घरी गेल्यावर आपली आई असते, मुलगा असतो, नवरा असतो. असे आपल्याला सांभाळायला कोणीतरी असतं. तिथे कोणी नसतं. मग जे असताच, जे भेटतात ती आपली माणसं असतात. असं तिथे होतं. मग पुढे चुका होतं जातात. तसंच माझंही झालं.”

हेही वाचा – “१० वर्ष प्रायोगिक नाटकं, साडेतीन वर्ष मालिका करून…”, सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा झापूक झुपूक बोलून…”

जान्हवी कोणत्या चुकीविषयी बोलतेय?

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्याच्या काही आठवड्यांनंतर जान्हवीचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. यावेळी तिने वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. ज्या राज्य सरकारने तुम्हाला पुरस्कार दिला असेल त्यांना आता पश्चाताप होतं असेल, अशा शब्दात जान्हवी वर्षा उसगांवकरांना बोलली होती. त्यानंतर तिने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केला होता. ती म्हणाली होती, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत.”

जान्हवीच्या या विधानांमुळे खळबळ उडाली होती. मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांची जान्हवीचा निषेध केला होता. अभिनेत्री सुरेखा कुडची, विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, मेघा धाडे, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर रितेश देशमुखने जान्हवीला कडक शिक्षा दिली. तिला थेट जेलमध्ये टाकून ‘भाऊच्या धक्क्या’वर बसण्यास मनाई केली. या शिक्षेनंतर सगळ्यांना एक वेगळीच जान्हवी पाहायला मिळाली.