Kaun Banega Crorepati 16: ‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे. महानायक अमिताभ बच्चन या रिअॅलिटी शोचे होस्ट आहेत. या शोचे सध्या १६ वे पर्व सुरू आहे. या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्पर्धकाने स्वेच्छेने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण प्रश्नाचं उत्तर न येणं नव्हतं, तर वेगळंच होतं.

जवळपास २४ वर्षांपासून हा शो स्पर्धकांचे मनोरंजन करत आहे. या क्विझ शोमध्ये स्पर्धक प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकतात. या शोला १६ पर्वात अनेक करोडपती स्पर्धकही मिळाले. पण या पर्वात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात एका स्पर्धकाने सांगितलेल्या निर्णयामुळे अमिताभ बच्चन व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोलकात्याहून आलेले डॉ. नीरज सक्सेना हॉटसीट पोहोचले, ते उत्तम खेळत होते मात्र अचानक त्यांनी हा शो सोडायचं ठरवलं.

हेही वाचा – सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”

नीरज सक्सेना यांनी किती पैसे जिंकले?

शोमध्ये नीरज सक्सेना खूप छान खेळत होते. त्यांनी सहा लाख ४० हजार रुपये जिंकले होते. मात्र याचदरम्यान त्यांनी एक धक्कादायक निर्णय होस्ट अमिताभ बच्चन यांना सांगितला. नीरज म्हणाले की त्यांना हा शो सोडायचा आहे. त्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाले की शोमध्ये आलेल्या इतर स्पर्धकांना एकदा खेळण्याची संधी मिळावी म्हणून ते हा निर्णय घेत आहेत.

डॉ. नीरज सक्सेना व अमिताभ बच्चन

हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

कोण आहेत नीरज सक्सेना?

नीरज सक्सेना हे जेएसआय युनिव्हर्सिटीचे पीआरओ चान्सलर आहेत. त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केले आहे. अब्दुल कलाम हे त्यांचे बॉस होते, त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक प्रकल्पांवर काम केलं होतं. सक्सेना यांची ही कामगिरी ऐकून बिग बींनी त्यांचं कौतुक केलं.

नीरज सक्सेना काय म्हणाले?

नीरज सक्सेना म्हणाले, “सर, माझी एक विनंती आहे, मी आता शो सोडू इच्छितो. बाकी स्पर्धकांना खेळण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. इथे प्रत्येकजण आपल्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे जे कमावलंय ते पुरेसं आहे.” नीरज यांचं बोलणं ऐकून होस्ट अमिताभ स्तब्ध झाले.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक

अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया

बिग बी म्हणाले, “सर, आम्ही असे उदाहरण यापूर्वी कधीच पाहिले नाही. ही तुमची महानता आहे. तुमचं मन खूप मोठं आहे. आज आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो आहोत. मी आज सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की २० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या खेळात पहिल्यांदाच असं घडलं की इतर स्पर्धकांना खेळता यावं म्हणून एक स्पर्धक शो सोडतोय. यापूर्वी कधीच कोणत्याही स्पर्धकाने इतरांसाठी खेळ सोडलेला नाही.”

नीरज सक्सेना यांच्या मनाचा मोठेपणा पाहून अमिताभ बच्चन यांनी त्यांचं खूप कौतुक केलं.