Kedar Shinde on Bigg Boss Marathi 5 70 days: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व ब्लॉकबस्टर ठरले. या घरातील स्पर्धकांची भांडणं, प्रेम, वाद, बिग बॉसने दिलेल्या शिक्षा या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. हा शो इतका गाजला तरी १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तसेच आर्याने निक्कीला कानशिलात मारल्यानंतर तिला थेट निष्कासित का केलं, यासंदर्भात कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस हा १०० दिवसांचा शो असतो. यंदा मराठीच्या पाचव्या पर्वाने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. हा ब्लॉकबस्टर शो १०० ऐवजी फक्त ७० दिवसांत आटोपण्यात आला, तर त्यामागचे कारण या असं विचारल्यावर केदार शिंदे म्हणाले, “मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो आणि काही गोष्टी मॅनेजमेंट लेव्हलच्या असतात. जेव्हा मॅनेजमेंट आम्हाला या गोष्टी समजावून सांगते, त्याचे परिणाम-दुष्परिणाम जे सगळ्या नेटवर्कसाठी असतात त्याचा विचार करून हा सीझन ७० दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘टिपरे’ केल्यावर मला सवय लागली की कधी बंद करताय असं लोकांनी विचारू नये. आता सगळेच ७० दिवस का? असं विचारतात. तर थोडी रुखरुख लागलेली चांगली असते.”

सूरज चव्हाणला जिंकवणं हा सहानुभूतीचा खेळ? केदार शिंदेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “तो छक्के-पंजे…”

आर्याला काढण्याच्या निर्णयावर काय म्हणाले केदार शिंदे?

आर्या जाधवला काढण्याचा निर्णय योग्य होता का? तिला शिक्षा देऊन घरात ठेवता आलं असतं, असं वाटत नाही का? असा प्रश्न केदार शिंदे यांना लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात. “प्रत्येक गेमचा एक नियम असतो, शिस्त असते. बिग बॉसचे नियमच आहेत की तुम्ही एकमेकांवर आरोप करू शकता, काहीही बोलू शकता, धक्का देता येऊ शकतो, पण तुम्ही हात नाही उचलू शकत,” असं ते म्हणाले.

अक्षरांचा अन् अंकांचा गोंधळ, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, “त्याने शक्कल…”

“नियम डावलून तिला काढलं नसतं आणि इतर कोणी हीच चूक दुसऱ्या कुणी केली असती तर मग काय केलं असतं? ते १६ लोक एकमेकांना मारत सुटले असते. हा नियम बिग बॉसचा आहे आणि एंडमॉल हा शो चालवतं, त्यामुळे ही घटना घडल्यावर आम्ही तीन दिवस त्यासाठीच थांबलो होतो. त्यानंतर सगळे नियम पाहण्यात आले आणि त्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि मग ती गोष्ट घडली,” असं केदार शिंदे यांनी आर्या जाधवला निष्कासित करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं.