Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: रील स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. लोकांनी त्याच्या विजयावर जल्लोष केला, तर काही सेलिब्रिटींनी मात्र हा सहानुभूतीचा खेळ असल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली. बऱ्याच जणांना सीझनमध्ये ‘जेंटलमन’चा टॅग मिळालेला अभिजीत सावंत विजेता व्हावा असं वाटत होतं. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजच्या विजयानंतर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सूरज चव्हाण जिंकल्यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेकांना हा निर्णय पटला नव्हता. खेळच्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास सूरजपेक्षा अभिजीतसह इतरही अनेक जण डिझर्व्हिंग होते, असं म्हटलं गेलं. काहींनी पोस्ट केल्या आणि नंतर डिलीटही केल्या होत्या. केदार शिंदे यांनी यावर त्यांचं मत मांडलं आहे. तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचाच आम्ही आदर केला आहे असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”

अभिजीत व सूरज टॉप २ मध्ये होते आणि सूरज जिंकला. अनेकांना वाटलं होतं की अभिजीत जिंकेल. सूरज जिंकल्यावर मनोरंजनसृष्टीतून अनेक पोस्ट आल्या, त्यात हा ‘सिंपथी गेम’ होता का? असं अनेकांनी लिहिलं. यावर मत विचारल्यावर केदार शिंदे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “बिग बॉस हा लोकांच्या वोटिंगचा गेम आहे. त्यामुळे जर मी ही गोष्ट उलट केली असती आणि सूरज जिंकला नसता, तर मग काय झालं असतं? याचा विचारही करण्याची गरज आहे. कारण लोकांच्या भावना आहेत की आम्ही वोट केलंय आणि आम्ही ज्यांना वोट केलंय तोच माणूस जिंकायला पाहिजे.”

हेही वाचा – रितेश भाऊंचा फुल्ल सपोर्ट! सूरज चव्हाणची भविष्यात आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय; दिली ‘ही’ खास भेट

सूरज चव्हाण छक्के-पंजे खेळत नव्हता – केदार शिंदे

पुढे ते म्हणाले, “जे चित्र आता मी बघतोय त्यावरून लोकांचं सूरजबद्दलचं ते प्रेम होतं आणि ते प्रेम अभिजीतच्या मनामध्येही होतं. तुम्ही पूर्ण सीझन पाहिला असेल तर जेव्हा जेव्हा सूरज त्याला म्हणाला की ‘मला ट्रॉफी पाहिजे,’ तर अभिजीतने खूप मोठ्या मनाने सांगितलंय की ‘तुलाच मिळो ट्रॉफी’. हे तो संपूर्ण सीझनमध्ये बऱ्याच वेळा बोलला आहे. सूरज हा काही खेळाडू नव्हता, छक्के-पंजे खेळत नव्हता, तो जसा बाहेर आहे, तसाच आतमध्येही होता. मला अभिजीत आवडला होता. मात्र काही लोकांनी मनाने विचार केला, काही लोक डोक्याने विचार करतात. आता मेंदू श्रेष्ठ की मन श्रेष्ठ यावर चर्चा होऊ शकते. आमच्याकडून, कलर्स मराठीकडून त्या मतांचा आदर राखला गेला, जी मतं फक्त महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून आली होती. त्या मतांचंच फळ म्हणजे सूरज चव्हाण आज विजेता आहे.”