प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसा मोबाइल हा अविभाज्य घटक झाला आहे. तसंच काही मालिकेच्या बाबतीत झालं आहे. मालिकेसाठी सध्या टीआरपी हा अविभाज्य घटक झाला आहे. एखादी मालिका कधीपर्यंत सुरू ठेवायची हे त्या मालिकेच्या टीआरपीवर अवलंबून असतं. जर मालिकेचा टीआरपी चांगला असेल तर ती मालिका दीर्घकाळ सुरू असते. पण जर मालिकेला टीआरपी मिळतंच नसेल तर मग ती मालिका अचानक बंद केली जाते. नाहीतर त्या मालिकेची वेळ बदलली जाते. त्या मालिकेला अशी वेळ दिली जाते, ज्यावेळी प्रेक्षकवर्गाची संख्या फार नसते. मालिका व टीआरपीचं हे नवीन समीकरण सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कमी टीआरपीमुळे बऱ्याच मालिका अवघ्या काही महिन्यांत ऑफ एअर करण्यात आल्या आहेत.

पूर्वी मालिका पाच ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं होत्या. पण आता अशा मालिका हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत आहेत. टीआरपी इतका महत्त्वाचा झाला आहे की मालिका अवघ्या तीन महिन्यातही बंद केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’वरील ‘कस्तुरी’ या मालिकेने तीन महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. असं काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये सुरू झालेल्या एका मालिकेने काल अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा – ‘रेड २’ चित्रपटाचा खलनायक ठरला, अजय देवगणला टक्कर देणार ‘हा’ मराठी सुपरस्टार

‘जगात वाईट पुरुष जात, सगळेच लुच्चे एकसाथ..’ असं म्हणत आलेल्या तेंडुलकर कुटुंबातील महिलांची गोष्ट आता संपली आहे. ‘सोनी मराठी’वरील ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल, १२ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ३ ऑक्टोबर २०२३ पासून ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ ही मालिका सुरू झाली होती. नयना आपटे, सीमा देशमुख, शर्वाणी पिल्ले, विनय येडेकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबतच महिमा म्हात्रे, रेवती लिमये, अनुज साळुंखे, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी हे नवोदित कलाकार या मालिकेत पाहायला मिळाले होते.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरने ‘पंचक’ चित्रपटाचं केलं कौतुक, माधुरी दीक्षित व श्रीराम नेनेंचे मानले आभार, म्हणाला…

दरम्यान, ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ मालिकेतील अभिनेता अनुज साळुंखे नव्या मालिकेतून आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झी मराठी’वरील ‘पारु’ मालिकेत अनुज पाहायला मिळणार आहे.

Story img Loader