आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाने आक्रामक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. सरकारने ती मुदत न पाळल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतर भागातही जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज उपोषण करत आहे. साताऱ्यातील साखळी उपोषणात अभिनेते किरण माने देखील आंदोलनकर्त्यांबरोबर बसले. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला एका गोष्टीची भीती वाटतेय”, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळावरून संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे काही फोटो शेअर करत किरण मानेंनी लिहिलं, “सातार्‍यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणेमंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले ७५ वर्षांचे तात्या सावंत दोन दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना ‘तब्येतीची काळजी घ्या’ अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ‘करो या मरो’ या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या… इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो!
…आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीही माजलेला असला तरी एका डरकाळीत जागेवर थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे?
जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आत्तातरी पूर्ण विश्वास वाटतोय! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त ‘पाझिटिव्ह’ विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं हाय.
माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत हाय! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपणा करायच्या आधी कुटुंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार… आपण मिळवणारच…कुणाचा बाप ते थांबवू शकत नाय!” असं किरण माने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा उपोषण केलं, तेव्हा ते उपोषण मागे घ्यायला लावण्यात राज्य सरकारला यश आलं होतं. उपोषण मागे घेताना पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती, पण सरकारने त्याबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषण करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane post on maratha reservation manoj jarange patil protest hrc
Show comments