बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहे. पण आता नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एपिसोडमध्ये कृष्णाने एक वक्तव्य केलं, त्यावरून त्याच्या आणि मामा गोविंदा यांच्यादरम्यान गोष्टी हळूहळू सुधारत आहेत. दोघांचा वाद नेमका कशावरून झाला होता आणि आता कृष्णाने मामा गोविंदाबद्दल काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊयात.
ताज्या एपिसोडमध्ये रिचा अनिरुद्ध, मिनी माथूर, दीप्ती भट्टनागर आणि रेणुका शहाणे पाहुणे म्हणून आले होते. सपना बनून कृष्णा अभिषेक स्टेजवर आला आणि रेणुका शहाणेला म्हणाला, “मी तुमची खूप मोठी चाहती आहे. मी तुमचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. तुम्ही नुकताच ‘श्री श्री गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट केला होता ना.”
यावर कपिलने सपनाला दुरुस्त करत चित्रपटाचे नाव ‘गोविंदा मेरा नाम’ असल्याचे सांगितले. यावर कृष्णा म्हणाला, “मी हे नाव थेट घेऊ शकत नाही. कारण ते माझे मामा आहेत.” यासोबतच कृष्णाने एक पंच लाईन मारली आणि मामा रुसला तर त्याची मनधरणी लवकर करायची असं म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यादरम्यान काही वर्षांपासून वाद सुरू आहे. गोविंदा तर कृष्णाबद्दल बोलणं कटाक्षाने टाळतो. पण, कृष्णा मात्र बऱ्याचदा मामाबद्दल बोलत असतो. कृष्णा व बहीण आरती सिंह या दोघांनीही कठीण काळात आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत असताना मामा गोविंदाने आर्थिक मदत केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दर महिन्याला त्यांच्याकडून फक्त दोन हजार रुपये मिळायचे, असं म्हटलं होतं. त्यावरून गोविंदा व त्याची पत्नी सुनिताने नाराजी व्यक्त केली होती. घरातील गोष्टी जाहिरपणे बोलण्याची गरज नसल्याचं गोविंदा व सुनिता यांचं म्हणणं होतं.